किरकोळ वाद टोकाला! नववीतील विद्यार्थ्याचा दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, पालकवर्ग चिंतेत, जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:10 IST2026-02-28T13:09:13+5:302026-02-28T13:10:12+5:30
मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

किरकोळ वाद टोकाला! नववीतील विद्यार्थ्याचा दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, पालकवर्ग चिंतेत, जुन्नरमधील घटना
वडगाव आनंद : किरकोळ वादातून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) दुपारी विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाणे येथे अल्पवयीन आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमती रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय येथे नववीतील एका विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत वाद सुरू होता. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांवर आरोपीने चाकूने हल्ला केला. मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ मारुती यादव (वय १४) हा शाळेतील सुट्टीदरम्यान शौचालयाजवळ उभा असताना संबंधित विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी आयुष गणेश वाळुंज पुढे गेला असता आरोपीने त्याच्यावर वार केले. त्यानंतर पार्थ यादव हा आयुषला वाचविण्यासाठी पुढे सरसावला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे. जखमी विद्यार्थी सध्या उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाणे करत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांमधील किरकोळ वाद अशा टोकाला जात असल्याच्या घटना वाढत असल्याने पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे. वडगाव आनंद येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन व शिस्तीवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.