Pune Accident: खड्डे चुकवताना ताबा सुटला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी, कल्याण–आहिल्यानगर राज्य मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:52 IST2026-01-27T11:51:37+5:302026-01-27T11:52:06+5:30
Pune Otur Accident: या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यापूर्वीही येथे अनेक अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे

Pune Accident: खड्डे चुकवताना ताबा सुटला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी, कल्याण–आहिल्यानगर राज्य मार्गावरील घटना
ओतूर (जुन्नर): कल्याण–आहिल्यानगर राज्य मार्गावर ओतूर येथील कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात वरद अमोल तांबे (वय २०) रा.ओतूर ता. जुन्नर ( पुणे) व करण पवळे (वय २८) रा. पिरंगुट, पुणे) यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, चार तरुण कारमधून कल्याणच्या दिशेने प्रवास करत होते. ओतूर येथील कोळमाथा नजीक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने ते चुकवण्याचा प्रयत्न करत असताना वाहनचालकाचा ताबा सुटला. यावेळी कार प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या कवठाच्या झाडावर जोरात आदळली. त्यानंतर पुढे असलेल्या कठड्याला धडक देत पलटी झाली.
अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरशः मोठे नुकसान झाले. वाहनातील चारही तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व ओतूर पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. त्यापैकी एकाला ओतूर येथील तर दुसऱ्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित दोघांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता वरद तांबे व करण पवळे यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर ओतूर परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी व वाहनचालकांनी या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यापूर्वीही येथे अनेक अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मानवाधिकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत पा. डुंबरे यांनी दिला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.