खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या कामाला वेग; राधाकृष्ण विखे पाटलांची विधानसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:00 IST2026-03-18T14:00:25+5:302026-03-18T14:00:59+5:30
बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले

खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या कामाला वेग; राधाकृष्ण विखे पाटलांची विधानसभेत माहिती
पुणे : खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ३० ते ३२ किलोमीटर लांबीच्या जुन्या कालव्याच्या पुनर्वापराबाबतही राज्य सरकार धोरण ठरवणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि. १७) विधानसभेत दिली.
दौंडचे आमदार राहुल कूल यांनी विधानसभेत खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प, चिबड जमिनीच्या संदर्भातील धोरण, टाटा पॉवरचे पाणी मिळणे व उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर बॅरेज बांधणे आदी प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर विखे यांनी उत्तर दिले. यावेळी आमदार विजय शिवतारे, विक्रम पाचपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला.
विखे म्हणाले, जुन्या कालव्यालगत सुमारे ३७० हेक्टर जागा उपलब्ध असून, सध्या त्या भागातील अतिक्रमणे हटवून जागा सुरक्षित करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल. कालव्याच्या उपयुक्ततेसंदर्भात धोरण तयार करणार आहोत.
मुळशी परिसरातील टाटा धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाची टाटा पॉवरशी चर्चा सुरू असून, तत्त्वतः पाणी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. किमान सात ते आठ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील दोन-तीन महिन्यांत याबाबत ठोस निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोपा बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्याचे धोरण ठरविले असून, कार्यवाही करत आहोत. दौंड, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील मागील भागातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मोठे बॅरेज उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लाभ क्षेत्राबाहेरील चिबड जमिनीसंदर्भात शासनाने प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाला मान्यता दिली असून, एक ते दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असेही ते म्हणाले.
पुरंदर उपसा सिंचन योजनेतील पाण्याच्या वाटपाबाबत निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी संबंधित आमदार व विभागांशी बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढला जाईल. तसेच डिंभे धरणाशी संबंधित प्रलंबित बोगदा प्रकल्पालाही लवकरच मंजुरी देऊन काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.