मुलांना शिस्तीत ठेवणे गरजेचे; वेळेप्रसंगी मारले तरी चालेल, पालकाचे शाळेला लेखी पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:32 IST2026-02-02T17:32:08+5:302026-02-02T17:32:36+5:30
आजची मुलं मोबाईलवर 'रिल्स' पाहून शालेय जीवन जगत आहेत, हे भविष्यासाठी धोक्याचे आहे

मुलांना शिस्तीत ठेवणे गरजेचे; वेळेप्रसंगी मारले तरी चालेल, पालकाचे शाळेला लेखी पत्र
बारामती : महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव शिक्षा करू नये किंवा शाळेतून काढू नये, असा निर्णय घेतलेला असतानाच, बारामती तालुक्यातील सावळ येथील पालकांनी घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. आपल्या पाल्याने भविष्यात सुसंस्कृत नागरिक व्हावे यासाठी पालकांनी स्वतःहून पुढाकार घेत शाळा प्रशासनाला शिस्तीच्या कारवाईसाठी चक्क लेखी संमती दिली आहे.
ज्ञानसागर गुरुकुल सावळ येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी वैष्णवी संतोष मासाळ हिचे पालक संतोष दत्तात्रेय मासाळ यांनी शाळा प्रशासनास एक लेखी अर्ज सादर केला आहे. या अर्जात त्यांनी नमूद केले आहे की, शासन निर्णयामुळे शिक्षकांवर मर्यादा असल्या तरी मुलाला योग्य वळण लागण्यासाठी शाळेची शिस्त आवश्यक आहे. भविष्यात पाल्याकडून कोणताही शिस्तभंग झाल्यास किंवा त्याच्या वागण्यात उणिवा आढळल्यास शिक्षकांनी योग्य ती कारवाई करावी. या निर्णयाबाबत आम्ही शाळा किंवा शिक्षक यांच्याकडे कोणतीही तक्रार करणार नाही, अशी लेखी हमीच या पालकांनी दिली आहे.
...रिल्स पाहून मुलं बिघडतायत, त्यांना शिस्त हवीच
या निर्णयाबाबत बोलतांना पालक संतोष दत्तात्रय मासाळ यांनी अत्यंत मार्मिक मत व्यक्त केले आहे. आज ग्रामीण भागातील शाळा टिकवणे आणि गुणवत्ता जपणे हे मोठे आव्हान आहे. पालक साध्या गोष्टीवरून शिक्षकांशी वाद घालू लागले तर विद्यार्थ्यांना शिस्त कशी लागणार? आजची मुलं मोबाईलवर 'रिल्स' पाहून शालेय जीवन जगत आहेत, हे भविष्यासाठी धोक्याचे आहे. लहान वयातच मुलं संस्कारित होऊ शकतात. माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शिक्षकांनी त्याला शिस्तीत ठेवणे गरजेचे आहे. प्रसंगी तिला शिक्षकांनी मारले तरी आमची तक्रार नसेल, असे संमती पत्रात नमूद केले आहे.