इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, अशांततेचा फटका; सफरचंदाचे दर गगनाला, ग्राहक ताज्या मालाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:45 IST2026-01-24T18:44:38+5:302026-01-24T18:45:11+5:30
मागील महिनाभरात १२० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे सफरचंद सध्या १८० ते २०० रुपये किलोने विकले जात आहे

इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, अशांततेचा फटका; सफरचंदाचे दर गगनाला, ग्राहक ताज्या मालाच्या प्रतीक्षेत
इंदापूर: इराणमधील वाढती अशांतता, अंतर्गत बंडखोरी व संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम इंदापूरच्या फळबाजारावर होताना दिसत आहे. सफरचंदाच्या आयातीवर परिणाम झाल्याने मागील महिनाभरात १२० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे सफरचंद सध्या १८० ते २०० रुपये किलोने विकले जात असून, वाढत्या किमतींमुळे ग्राहकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
इराण, चीन, तुर्कस्तान, चिली व न्यूझीलंड येथून भारतात मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात होते. यामध्ये इराण हा भारताचा तिसरा-चौथा मोठा पुरवठादार असून, स्वस्त व दर्जेदार सफरचंदासाठी तो ओळखला जातो. मात्र, इराणमधील सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे भारतातील आयात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. परिणामी सध्या ठोक विक्रेत्यांकडील साठवलेला मालच बाजारात विक्रीसाठी येत असून, त्याच्या चवीवर व गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
फळविक्रेते गणेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘गेल्या पंधरा-वीस दिवसांत सफरचंदाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. साठ्यातील सफरचंद विक्रीसाठी येत असून, काश्मीरची सफरचंद उपलब्ध आहेत; मात्र ग्राहकांची मागणी प्रामुख्याने इराणहून येणाऱ्या सफरचंदाला आहे. सध्या इंदापूरच्या फळबाजारात साठ्यातील सफरचंद येत असल्याने ताज्या मालाची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे. आयात सुरळीत न झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.