कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:58 IST2026-02-28T16:57:47+5:302026-02-28T16:58:02+5:30
२०१९ ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही

कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला शनिवारी(दि २८) एक महिना पुर्ण झाला. या निमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानातील स्मृतीस्थळावर नतमस्तक होत दर्शन घेतले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले,"सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे की, विमान अपघाताबाबत चौकशी व्हावी. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांनीही चौकशीचे आदेश दिले आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने निवेदन देत चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत देखील चौकशीची मागणी केली. सीबीआयद्वारे चौकशी सुरू आहे. दादांबद्दल सर्वांनाच हळहळ वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर घटनेचा तपास लागावा, ही सर्वांची मागणी आहे. यंत्रणेद्वारे तपास करताना ज्याने कोणी उपस`थित केलेल्या प्रश्नांचा तपास व्हावा, असं तटकरे म्हणाले. दादांनंतर वहिनींनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. वहिनींनी संपुर्ण जनता कुटुंब मानून धीरोदत्तपणे ही जबाबदारी घेतली. त्यांचे ऋण आम्ही व्यक्त करतोय. टिकाटीप्पणी करायची असेल ते करु शकतात. आम्ही आमचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं आहे.
तटकरे पुढे म्हणाले की, यापूर्वी दादांबद्दल कोण काय बोलले आहे, हे सर्वांना माहिती आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त स्वत: अजितदादा बारामतीतच म्हणाले होते की, मी कुटुंबात एकटा पडलो आहे. २०१९ ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते. हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही. अजितदादांचा आणि माझा ४० वर्षांचा प्रवास आहे. त्यांच्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे. जो कोणी बोलतो, त्याने नाव घेऊन बोलावे. अस्पष्ट विधानांचा काही उपयोग नाही. ज्यांना बोलायचं ते बोलु द्या काळाच्या ओघात सर्व उत्तरे आहेत असे तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.