HSC Exam 2026: आजपासून बारावीची परीक्षा; तणावमुक्त व्हा अन् पेपर साेडवा, राज्यात १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:03 IST2026-02-10T12:02:37+5:302026-02-10T12:03:52+5:30
HSC Exam 2026 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, ड्राेनची नजर, कर्मचारी अदलाबदल आदी उपाययाेजना करण्यात आल्या आहेत

HSC Exam 2026: आजपासून बारावीची परीक्षा; तणावमुक्त व्हा अन् पेपर साेडवा, राज्यात १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांची नोंदणी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारी (दि. १०) सुरुवात हाेत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील तब्बल १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार विद्यार्थीसंख्या वाढली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष (प्रभारी) डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
परीक्षेच्या काळात काेणताही गैरप्रकार हाेऊ नये म्हणून २७१ भरारी पथक नेमण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा, ड्राेनची नजर, कर्मचारी अदलाबदल आदी उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे.
इयत्ता बारावी परीक्षेसाठी गतवर्षी १५ लाख ५ हजार ०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली आणि १८ तृतीयपंथी विद्यार्थी आहेत. माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी २ लाख ३६ हजार ३२०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून राज्य मंडळाने अगदी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सूचना
- राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.
- परीक्षा सुरू हाेण्याच्या अर्धातास आधी केंद्रावर पोहोचावे.
- परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिली जाईल, याची नाेंद घ्यावी.
- विद्यार्थ्यांनी तणावमुक्त हाेऊन परीक्षेला सामाेरे जावे. गरज पडल्यास तत्पूर्वी समुपदेशकांशी बोलावे.