सरकारला आम्हाला खरोखरच मदत करण्याची इच्छा आहे का?, लिंक सुरू पण सर्व्हरच डाऊन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:13 PM2021-05-23T20:13:04+5:302021-05-23T20:14:45+5:30

रिक्षा संघटनांचा अनूभव, पैसे द्यायचेत की नाही असा उद्विग्न सवाल

The government doesn't really want to help us, the link starts but the server goes down! | सरकारला आम्हाला खरोखरच मदत करण्याची इच्छा आहे का?, लिंक सुरू पण सर्व्हरच डाऊन!

सरकारला आम्हाला खरोखरच मदत करण्याची इच्छा आहे का?, लिंक सुरू पण सर्व्हरच डाऊन!

Next
ठळक मुद्दे संकेतस्थळावरून अर्ज दाखल करण्याची काहीच प्रक्रिया सुरू होत नसल्याचा अनुभव

पुणे: सरकारकडून बऱ्याच प्रतिक्षेनंतर रिक्षा चालकांना मदत करण्यासाठी लिंक जाहीर झाली. मात्र सर्व्हरच डाऊन असल्याने त्यावरची अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे जायलाच तयार नाही. रिक्षा पंचायतीसह आप व अन्य रिक्षा संघटनांचा आजचा दिवसभराचा हाच अनुभव होता. 

सरकारला आम्हाला खरोखर मदत करायची इच्छा आहे की नाही असा उद्वेगजनक प्रश्न रिक्षा चालक करत आहेत. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर परिवहन विभागाने transport.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ शनिवारी रात्री जाहीर केले. रिक्षा पंचायत संघटनेने रिक्षा चालकांच्या मदतीसाठी म्हणून त्यांची १२ मदत केंद्र तयार ठेवली होती. त्यापैकी अरण्येश्वर येथे नगरसेविका अश्विनी नितिन कदम यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या केंद्राचे पंचायतीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांनी उदघाटन केले. पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अश्विनी कदम व नितिन कदम ऊपस्थित होते.

मात्र या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करण्याची काहीच प्रक्रिया सुरू होत नसल्याचा अनूभव आला. पिंपरी चिंचवड मध्ये मानव.कांबळे यांच्या हस्ते सुरू झालेल्या केंद्राचाही हाच अनूभव होता असे नितीन पवार यांनी सांगितले. आप रिक्षा संघटनेनेही शहरात त्यांच्या वतीने अशीच साह्य केंद्र सुरू केली आहेत. त्यांनाही असाच अनुभव आला अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत आचार्य यांनी दिली.
 
कोरोना निर्बंध काळात सरकारने रिक्षा चालकांंना १५०० रूपये मदत जाहीर केली आहे. त्याला महिना होऊन गेला तरीही सरकारकडून यासाठीची पद्धत जाहीर होत नव्हती. त्याचवेळी मदत जाहीर झालेल्या इमारत बांधकाम मजूर, घरेलू कामगार व फेरीवाले यांच्या बँक खात्यात हे पैसे जमाही झाले आहेत. रिक्षा चालक मात्र अजूनही ऊपेक्षितच आहेत. राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांची संख्या ७ लाख आहे. ते सर्व या मदतीसाठी पात्र आहेत.

सरकारला इतकी साधी सुविधा अद्ययावत करता येत नसेल तर कठीण आहे. रिक्षा चालकांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकारने यात त्वरीत लक्ष घालावे. असे रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले आहे. 

सरकारला खरोखरच मदत करायची आहे की नाही असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. एकतर मदत अपूरी आणि तीपण वेळेवर मिळत नसेल तर रिक्षा चालकांनी काय करायचे? असा प्रश्न आप रिक्षा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: The government doesn't really want to help us, the link starts but the server goes down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.