प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे - मंत्री दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:30 IST2026-03-23T16:29:53+5:302026-03-23T16:30:06+5:30
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कला-क्रीडा आणि स्वसंरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे

प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे - मंत्री दादा भुसे
पुणे : एखादी मुलगी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होते, तेव्हा तिचे मनोबल उंचावते आणि तिच्या संपूर्ण जीवनात एक शिस्त निर्माण होते. हीच शिस्त देशाला बलशाली बनविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी 'पिंक रूम' ही नवी संकल्पना प्रत्येक शाळेत राबवण्याचे महत्त्वपूर्ण सूतोवाचही त्यांनी केले.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियाना'च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मंजूषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक हेमंत वसेकर, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला हाेता. यात ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज आणि त्यांच्या टीमने पुण्यातील ४७६ शाळांमधील १२ हजार विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले.
मंत्री भुसे म्हणाले की, आगामी काळात दिल्या जाणाऱ्या सैनिकी प्रशिक्षणातून ‘राष्ट्र प्रथम आणि देश सर्वोच्च’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजविली जाईल. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी एकाच वेळी २ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थिनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कला-क्रीडा आणि स्वसंरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियाना'मुळे महाराष्ट्रातील विद्यार्थिनी खऱ्या अर्थाने 'निर्भय' आणि 'आत्मनिर्भर' होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.