सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:04 IST2026-01-23T18:04:32+5:302026-01-23T18:04:32+5:30
महामार्गावर चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती हायवेच्या डाव्या बाजूला खाली जाऊन झाडाला धडकली

सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी
पुणे : सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चारचाकीचा चक्काचूर झाला आहे.
गौरख त्र्यंबक माने (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर समाधान अंकुश बाबर (वय 25, धंदा केळी व्यवसाय, रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), विजय सूर्यकांत माने, गोरख त्र्यंबक माने व अलिकेश खान असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान बाबर यांचे मामा विजय माने, चुलत मामा गोरख माने व त्यांचे मित्र अलिकेश खान असे चौघेजण मुंबई येथे केळी एक्सपोर्ट संदर्भात असलेली मीटिंग कामी गेले होते. मिटिंग झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी मुंबई येथून रात्री करमाळ्याकडे निघाले होते. हडपसर पुणे येथे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आले. नंतर विजय माने हे गाडी चालवण्यास बसले होते. तर त्यांच्या शेजारी सीटवर गोरख माने हे बसले होते. तर पाठीमागील सीटवर समाधान बाबर व विजय माने हे बसले होते.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा व कोरेगाव मूळ जवळ आले असता विजय माने यांचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व ती हायवे रोडच्या डाव्या बाजूला खाली जाऊन झाडाला धडकली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले तर गौरख माने यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्व जखमींना नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान गौरख माने यांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.