चालकाचे नियंत्रण सुटले; ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात, कल्याण - नगर रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:27 IST2026-02-12T11:25:23+5:302026-02-12T11:27:23+5:30
या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

चालकाचे नियंत्रण सुटले; ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात, कल्याण - नगर रस्त्यावरील घटना
ओतूर : कल्याण - नगर रोडवर गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. पिंपरी शाहाली ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथून सहलीसाठी निघालेली जिल्हा परिषद शाळेची मुलांनी भरलेली एसटी बस डुंबरवाडी हद्दीत टोल नाक्यापासून आळेफाटा दिशेला सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देऊन पलटी झाली. या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नेवासा येथील शाळेतील तब्बल ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी ओझर लेण्याद्री च्या दिशेने निघाली होती. बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी असा एकूण मोठा ताफा होता. नगर–कल्याण महामार्गावरून प्रवास सुरू असताना डुंबरवाडी परिसरात चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढील टायर फुटला आणि काही क्षणांतच वाहन पलटी झाले.
अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात मोठा आवाज झाला. बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धांत मुसळे, सार्थक कोकाटे,जिया शेख, ईश्वरी लहारे,सागर फावले,अनुराज काळे,रितेश मोरे,स्नेहल खंडागळे,शुभम गोंडुळे,पायल कचरे, काव्या गोसावी, आयर्न नवथर, विद्यार्थी जखमी झाले त्यात त्यांना हात-पायाला मार लागला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसच्यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ, शिक्षक व प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात सर्व जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या अपघातामुळे कल्याण नगर रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.