देवदर्शन अर्धवटच राहिले; ट्रकवर कार आदळून अपघात, एकाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:26 IST2026-01-26T12:26:28+5:302026-01-26T12:26:35+5:30
मध्यरात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रकचालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते, त्यामुळे अंधारात थांबलेला ट्रक कारचालकाला दिसला नाही

देवदर्शन अर्धवटच राहिले; ट्रकवर कार आदळून अपघात, एकाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर कार आदळल्याने झालेल्या अपघातातकारमधील एकाचा मृत्यू झाला. भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत कारचालक शुभम सुनील डुबळे (२७, रा. पूर्वा हाईट्स, धायरी) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवेघाट परिसरातील कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. शनिवारी (दि. २४) पहाटे पावणेतीनच्या सुमारास ते बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रकचालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते. रस्त्यात अंधारात थांबलेला ट्रक कारचालक शुभम याला दिसला नाही. ट्रकवर कार आदळून कारचालक शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भीमा याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती डुबळे याने पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक थोरात करत आहेत.