'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:35 IST2026-02-26T10:35:31+5:302026-02-26T10:35:53+5:30
अपघातात VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे

'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर
पुणे : पुण्यात मागील महिन्यात २८ जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत ५ लोकांनीही जीव गमावला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. महाराष्ट्राचा धुरंधर नेता गमावल्याने तो दिवस नागरिकानासाठी काळा ठरला आहे. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी पुरावे दाखवत डीजीसीए आणि व्हीसीआर कंपनीवर निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला त्याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. DGCA कडून मंगळवारी एक अहवाल आला. त्यात VSR कंपनीतील त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमाने उड्डाण करण्यास बंदी आणली. मात्र त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे.
या मागणीनंतर ते आज सकाळी बारामती पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यासाठी आले आहेत. हजारो बारामतीकर अजितदादांना न्याय देण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. अजितदादा अमर रहे, दादांना न्याय मिळालाच पाहिजेच्या घोषणा देत बारामतीकर तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. युगेंद्र पवारही याठिकाणी दाखल झाले आहेत.