श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:31 IST2024-12-26T12:31:10+5:302024-12-26T12:31:44+5:30

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळाची विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा

Build a memorial befitting the bravery of Dharmaveer Chhatrapati Shambhuraj at Shrikshetra Vadhu-Tulapur - Ajit Pawar | श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार

श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार

कोरेगाव भीमा : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे राजांचे ऐतिहासिक संदर्भ, प्राचीन वस्तुरचना व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून राजांचा शौर्याला, पराक्रमाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर श्रीक्षेत्र वढू- तुळापूर ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

श्रीक्षेत्र तुळापूर येथे शिरूर-हवेली मतदारसंघातील महत्त्वपूर्ण अशा छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिवले, तुळापूरच्या सरपंच ॲड. गुंफा इंगळे, व वढू व तुळापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदींसह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळाची विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधिस्थळ स्मारक वढू (बु.) विकास आराखड्याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील एकूण २६४ कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनस्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजुरी देण्यात येईल. या कामांचे सविस्तर आराखडे व अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याची कार्यवाही करावी असे सांगत नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच येथे जोडरस्ते व भीमा नदीवरील वढू खुर्द ते वढू बुद्रुकला जोडणाऱ्या तसेच आपटी-तुळापूरला जोडणाऱ्या दोन पुलांमुळे वढू-तुळापूरचा परिसराचा मोठा कायापालट हाेणार असल्याचे नमूद केले.

समाधिस्थळाचे काम लवकर सुरू करावे

वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील शंभूराजांच्या समाधिस्थळावरील विकास आराखड्यामधील कामे अद्याप सुरू झाली नसून ती जलदगतीने व गुणवत्तापूर्वक सुरू होऊन, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आराध्य दैवताच्या या ऐतिहासिक समाधीस्थळाचे काम लवकरच आपल्याच काळात पूर्ण होईल असे सर्व शंभूभक्तांना वाटत असल्याचे वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिवले यांनी सांगत पुण्यतिथी कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अथवा शासकीय निधीतून ५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

वढूत विद्यापीठ दर्जाचे शौर्यकला प्रशिक्षण केंद्र व्हावे

श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथील समाधी स्थळावर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने ९ कोटी रुपयांचे तटबंदी, बुरुंज, सभागृह, मेघडंबरी बांधकाम केले आहे. या कामांना धक्का न लागता 'शहाजी ते महादजी' ही मराठा वीर पुरुषांची स्मारक रुपाने मालिका साकार व्हावी तसेच शिव शंभूची शौर्य कला प्रचलित व्हावी यासाठी विद्यापीठ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र व्हावे अशी मागणी स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे यांनी केली. 

Web Title: Build a memorial befitting the bravery of Dharmaveer Chhatrapati Shambhuraj at Shrikshetra Vadhu-Tulapur - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.