भीमाशंकरचा विकास होणार; २८८ कोटींच्या निधीस मान्यता, तातडीने अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:56 IST2025-06-28T10:56:04+5:302025-06-28T10:56:47+5:30
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी

भीमाशंकरचा विकास होणार; २८८ कोटींच्या निधीस मान्यता, तातडीने अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांची सूचना
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजित व दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी २८८ कोटी १७ लाखांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी येथील विकासाची कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू मानून याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी येथील विकासाची कामे पूर्ण करावीत. त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून कामे सुरू करण्यात यावी. भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोप वेची सुविधा विकसित करावी. निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करून द्यावीत. तसेच, राजगुरूनगर-तळेघ-भीमाशंकर महामार्ग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारावी. तसेच, अखंडित वीजपुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी द्यावे, असेही त्यांनी सुचविले.