भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:57 IST2026-02-19T09:56:29+5:302026-02-19T09:57:21+5:30
भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या राठोड यांनी शेजारच्या दाम्पत्याकडे गृहोपयोगी साहित्य आणि भांडी दिली होती.

भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना
पुणे : नातेवाईकांकडे ठेवलेल्या गृहोपयोगी वस्तू तसेच भांड्यांच्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात ही घटना घडली.
भास्कर मोहन राठोड (५८, रा. कोलदंडी, जिंतूर, परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आनंद रवींद्र वर्मा (२६) आणि शीला आनंद वर्मा (२४, दोघेही रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) यांना अटक करण्यात आली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे मूळचे परभणीतील जिंतूरचे रहिवासी आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. वाघोलीतील आव्हाळवाडी भागात त्यांनी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. राठोड यांच्या शेजारी आरोपी वर्मा दाम्पत्य राहायला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहोपयोगी साहित्य आणि भांडी वर्मा दाम्पत्याकडे दिली होती. दि. १६ फेब्रुवारी राेजी राठोड यांनी वर्मा दाम्पत्याकडे भांडी मागितली. भांडी परत मागितल्यानंतर वाद झाला. या वादातून वर्मा दाम्पत्याने राठोड यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत राठोड हे गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शहादेव शहाळे करत आहेत.