अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण; 'तपास अतिशय वेगाने सुरु', सीआयडीने दिली फक्त एवढीच माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:32 IST2026-02-26T15:31:07+5:302026-02-26T15:32:47+5:30
पुण्यातील अनेक संस्था या तपासात असून सीआयडी आकस्मिक मृत्यूच्या अँगलने तपास करत आहे.

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण; 'तपास अतिशय वेगाने सुरु', सीआयडीने दिली फक्त एवढीच माहिती
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास करत असलेल्या विमानाचा २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ अपघात झाला. हा अपघात आहे की घातपात आहे, या मागे काही कट कारस्थान आहे का, या दृष्टीने राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) तपास करत आहे. हा तपास योग्य दिशेने आणि योग्य गतीने सुरू आहे, अशी माहिती सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन हा अपघात नाही, तर घातपात असल्याचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर अपघाताच्या तपासाची जबाबदारी असलेल्या सीआयडी अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुण्यातील मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली.
सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद म्हणाले, अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी रोजी अपघात झाल्यानंतर त्याची नोंद बारामती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे. राज्य शासनाने त्याचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक व त्यांचे पथक याचा तपास करीत आहेत. घातपात आहे का ? रॅश नेगलिजन्स आहे का (अक्षम्य असे दुर्लक्ष आहे का) ? यात गुन्हेगारी कृत्य किंवा कट आहे का ? या तीन मुद्द्यावर सीआयडी तपास करीत आहेत. याचा तपास योग्य दिशेने, वेगाने आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात येत आहे.
बारामती मेडिकल कॉलेज, फॉरेन्सिक महाविद्यालय तसेच फॉरेन्सिक लॅब यांची तपासामध्ये मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर केंद्रातील अन्य संस्थांची मदत घेतली जात आहे. एअरक्रॉफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोही याचा तपास करत आहे. त्यांचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष लक्षात घेण्यात येऊन त्याचा समावेश सीआयडीच्या तपासात करण्यात येणार आहे. राज्य शासनाने हा तपास सीबीआयने करावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या अपघाताचा तपास समाधानकारक सुरू आहे. यात घातपात किंवा गुन्हेगारी कृत्य असल्याचे निष्पन्न झाल्यास योग्य त्या कलमाखाली पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.’’
यासंदर्भात सीआयडीने भरपूर पुरावे गोळा केले आहेत. अनेक पुरावे, डेटा समोर आला आहे. अनेक तज्ज्ञ लोकांचा टेक्निकल रिपोर्ट घेतला जात आहे. हा तपास कधी पूर्ण होईल, हे सांगता येत नाही. न्यायालयाने तपासाबाबत कुठलीही टाइम मर्यादा घातलेली नाही. एअरक्रॉफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात ज्या दिवशी घातपात अथवा गुन्हेगारी कृत्य असल्याचा निष्कर्ष निघेल, त्यादिवशी पुढील कारवाई केली जाईल, असेही रामानंद यांनी स्पष्ट केले.