बारामती : गाेजुबावी (ता. बारामती) येथे चार्टर्ड विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामतीच्या इतिहासातील बुधवार हा ‘काळा दिवस’ ठरला आहे. या अपघातानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या चार्टर्ड विमानाच्या सुरक्षिततेबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात होते. काही पोस्टमध्ये संबंधित विमानाचा यापूर्वी अपघात झाल्याचेही दावे करण्यात आले.या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना वस्तुस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, विमानाला पक्षी धडकणे किंवा एखादा किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्यास DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय)च्या मार्गदर्शनाखाली आवश्यक दुरुस्ती केली जाते.विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण नवीन इंजिन बसवण्याची प्रक्रियाही अस्तित्वात आहे. DGCAची उड्डाण परवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही विमान हवेत झेप घेऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.तसेच, संबंधित घटनेनंतर DGCAकडून होणारा तपास व ब्लॅक बॉक्समधील माहिती समोर आल्यानंतरच नेमकी कारणे स्पष्ट होतील, असेही वंडेकर यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Ajit Pawar Passed Away : यापूर्वी ‘त्या’ चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता का? चर्चांवर हवाई तज्ज्ञांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:45 IST