Ajit Pawar Passed Away: “आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? रोहित पवारांचा नियतीला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:04 IST2026-01-31T11:04:25+5:302026-01-31T11:04:41+5:30
Ajit Pawar Passed Away ''महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, शेकडो लोकांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात निघून जावा, हे पचवणं अशक्य आहे”

Ajit Pawar Passed Away: “आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? रोहित पवारांचा नियतीला सवाल
बारामती : “दादा, आज तुमची राख जमा करत असताना क्षणभर वाटलं की, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तुम्ही पुन्हा या राखेतून उभं राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात म्हणाल, ‘अरे वेड्यांनो, का रडताय? मी तर तुमची गंमत करत होतो… आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी आपल्याला अजून खूप काम करायचंय!’” अशा हृदयस्पर्शी शब्दांत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे पुतणे व आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावनांना सोशल मीडियावर वाट करून दिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेले हे शब्द सध्या सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळात भावनिक ठावठिकाणा बनले आहेत. “जिथं अजितदादांनी विकासरूपी फुलांची बाग फुलवली, त्याच मातीत त्यांची राख सावडावी लागेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचं काही चालत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.
अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीपासून मन सुन्न झाल्याची भावना व्यक्त करत रोहित पवार म्हणतात, “डोकं अजूनही सुन्न आहे… मन बर्फासारखं थिजलंय. काय झालं, कसं झालं आणि का झालं, हे प्रश्न मनात काहूर माजवत आहेत. शेवटच्या काही दिवसांत झालेल्या चर्चा, संवाद, भावनिक क्षण सारखे टेपरेकॉर्डसारखे कानात घुमत आहेत. जणू अजूनही तुम्ही अदृश्य स्वरूपात आमच्याशी बोलत आहात, असा भास होतोय.”
“दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, शेकडो लोकांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात निघून जावा, हे पचवणं अशक्य आहे,” असे म्हणत त्यांनी आपली असहायता मांडली. नियतीवरच सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, “आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? एका क्षणात लाखो लोकांची लाखो स्वप्नं तू का राख केलीस?” हा सवाल सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील वेदना बोलून दाखवत असल्याचे चित्र आहे. स्व. अजित पवार यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर सामान्य माणसासाठी धावणारा एक आधारवड हरपल्याची भावना या शब्दांतून प्रकर्षाने व्यक्त होत आहे.