राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह २१ आंदोलकांची ३ खटल्यातून निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:11 IST2026-02-16T17:11:05+5:302026-02-16T17:11:35+5:30
२ हजार ७०० रुपयांची पहिली उचल दिली जावी अशी मागणी करुन २०१२ साली शेतकरी संघटनांनी ऊस आंदोलन सुरु केले होते

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह २१ आंदोलकांची ३ खटल्यातून निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?
इंदापूर: २०१२ च्या ऊस आंदोलन प्रकरणी इंदापूरन्यायालयात दाखल असणाऱ्या ८ पैकी ३ खटल्यातून राजू शेट्टी,सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची आज ( दि.१६) निर्दोष मुक्तता करण्यात आली. २ हजार ७०० रुपयांची पहिली उचल दिली जावी अशी मागणी करुन २०१२ साली शेतकरी संघटनांनी ऊस आंदोलन सुरु केले होते. राज्यातील कोणत्या ही साखर कारखानदाराने तोपर्यंत दर जाहीर केले नव्हते. तात्कालिन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्वीकारुन तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. सोलापूर- पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. कुंडलिक कोकाटे हा तरुण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला. त्यानंतर शेकडो शेतक-यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनात्मक संघर्षानंतर राजारामबापू कारखान्याने २ हजार ५०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यानंतर उस दराची कोंडी फुटली. राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या आंदोलनाने प्रतिटन ३०० रूपये जादा दर मिळाला. मात्र राज्यभरात आंदोलने झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजू शेट्टी,सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांवर इंदापूर न्यायालयात आठ दाखल झाले होते. इंदापूर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एच. फारुकी यांच्या न्यायालयात सुरु असणा-या तीन खटल्यातून आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ॲड.एन. जी.शहा,ॲड.महेश ढुके,ॲड.श्रीकांत करे यांनी विनामुल्य स्वरुपात आंदोलकांची बाजू मांडली.