तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:59 AM2021-03-03T04:59:24+5:302021-03-03T04:59:58+5:30

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हवरून टोला; राज्यपालांचा मान राखावा

Your voice does not really reach the peoples: Devendra Fadnavis to uddhav thackreay | तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय; पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील विधानाची आठवण करून देत, ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत खरंच पोहोचत नाही, हेच आम्ही सव्वावर्षापासून सांगत आहोत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत हाणला.


राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केला. राज्यात कोरोना वाढत असताना सरकार मात्र केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न होते. कोरोना उपाययोजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. अमरावतीत कोरोनाचे खोटे अहवाल दिले जात आहेत. अव्वाच्या सव्वा दराने खरेदी, वस्तू भाड्याने घेण्याचे प्रकार घडले. १,२०० रुपये किमतीचे थर्मामीटर ६,५०० रुपयांत घेण्यात आले. दोन लाख रुपये खर्चून खरेदी करता येण्याजोग्या चादरींसाठी साडेआठ लाख रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी अभिभाषणातून मांडलेले मुद्दे ही पोकळ माहिती आहे. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधता येत नाही, असे ते म्हणाले. 


राज्यपाल व्यक्ती नव्हे तर  व्यवस्था असते आणि त्यांचा मान राखला जाणे अपेक्षित असते; परंतु त्यांना विमान नाकारणे अधिकच गंभीर होते. इतका कोतेपणा सरकारने कधीही दाखविला नाही, अशी टीका त्यांनी केली. कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर किमान ३० हजार मृत्यू टाळता आले असते. आता लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. शिवजयंती अन् मंदिरे उघडी ठेवल्यानेच कोरोना वाढतो, हा अजब तर्क असल्याचे ते म्हणाले. 

देशभक्तीच्या ट्वीटचा अभिमान
भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी टूलकिटवाल्यांना प्रत्युत्तरात देशभक्तीचे ट्वीट केले, त्यात काय गुन्हा केला?  सरकार त्यांची चौकशी करणार हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच आम्ही त्यांची नाही तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करीत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तेव्हा, देशभक्तीचे ट्वीट करण्यामागे भाजप आहे तर मग मला त्याचा अभिमान आहे, तुमच्या चौकशांना आम्ही घाबरत नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

मंत्री टेंडर ठरवतात म्हणून कुलगुरूंचे राजीनामे
खात्याचे मंत्रीच विद्यापीठांतील कामांचे कंत्राट ठरवायला लागले आहेत. आपल्या कार्यक्रमांसाठी ते विद्यापीठांना वेठीस धरत आहेत. दबावापायी दोन कुलगुरूंनी राजीनामे दिले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

पूजा चव्हाणप्रकरणी निलंबनाची मागणी
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी एफआयआर न नोंदविणाऱ्या वानवडी; पुणे ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा. १२ ऑडिओ क्लिप आहेत, थेट पुरावे आहेत मग आणखी काय पाहिजे, गुन्हा का नोंदवत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

Web Title: Your voice does not really reach the peoples: Devendra Fadnavis to uddhav thackreay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.