महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:47 IST2021-02-08T16:45:04+5:302021-02-08T16:47:05+5:30
inquiry of celebrities tweets : रोखठोक उत्तर दिलं म्हणून भारतरत्नांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणार का? शेलारांचा सवाल

महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप
केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी पाठिंबा देणारं ट्वीट केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटींनी ट्वीट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटजच्या ट्वीटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्यानं याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध करण्यात येत आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी यावरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
"आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्वीटची चौकशी करणार असं भयंकर वृत्त आताच समजलं. कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी," असं म्हणत शेलार यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटर माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली.
आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
1/2
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार
आणि
भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?
वा रे वा!
महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!
2/2
सचिन सावंतांकडून मागणी
दरम्यान, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसंच, सर्व सेलिब्रिटींचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.