अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:47 IST2025-06-16T13:46:36+5:302025-06-16T13:47:19+5:30

प्रशासकीय दुर्लक्ष, असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत

The officials' rhinoceros skin is getting stronger; Netizens are angry and express their grief over the Maval accident. | अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त

अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त

पिंपरी : कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, अशी टीका होत आहे.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणतात, इंद्रायणी पूल कोसळला, मी पुन्हा सांगतोय, अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय. 

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी म्हणतात, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि जखमी झालेले पर्यटक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. नदीत अडकलेल्यांना तातडीने मदत द्यावी.

नासिर शेख म्हणतात, घरातून बाहेर पडताना आपापल्या जबाबदारीने बाहेर पडा. सर्व ठिकाणी डबल इंजिन सरकारने विकास होत आहे. पूल, रेल्वे, रस्ते, विमान, मेट्रो, बस यांचे कधी काय होईल, सांगता येत नाही.

प्रदीप थत्ते म्हणतात, इन्स्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सर मुला-मुलींनी या ब्रीजवर उभे राहून इतक्या रील्स टाकल्या की, सगळी गर्दी वाढली. हा पूल जुना आहे. गावातले लोक नेहमी सांगत असत की त्यावर जास्त गर्दी करू नका, पण नाही. उलट लोक दुचाकी गाड्या घेऊन घुसत होते. आगाऊपणा नडत आहे.

अजिंक्य आयरेकर म्हणतात, उत्साहातून लोकांकडून घडणारा निष्काळजीपणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रशासकीय दुर्लक्ष, असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत. आता प्रशासकीय नाटक, दोषारोपाचा खेळ सुरू होईल. सार्वजनिक ठिकाणी बारकाईने लक्ष नाही. नियोजन नाही. सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आनंद झांबरे म्हणतात, मृत्यू स्वस्त झाला आहे. याच्याशी कुणाला काही देणे घेणे नाही. फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार. जोपर्यंत आपण स्वतःहून सुधारणार नाही, तोपर्यंत या गोष्टी चालतच राहणार.

कुणाल चौधरी म्हणतात, पुण्यात पूल कोसळला, केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली. गुजरातमध्ये विमान अपघात झाला. हे काय होत आहे? मृत्यू इतका स्वस्त होत आहे. जिथे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, याबाबत सरकारला काहीही चिंता नाही.

Web Title: The officials' rhinoceros skin is getting stronger; Netizens are angry and express their grief over the Maval accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.