पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी नव्हे, विष पाजतेय..! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:02 IST2026-05-07T15:46:20+5:302026-05-07T16:02:29+5:30
Pimpri-Chinchwad : पवना नदीतील रासायनिक पाण्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी नव्हे, विष पाजतेय..! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
पिंपरी : शहरातील नागरिकांना कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. जेथून पाणी उचलतो, तेथे पवना नदी मृतावस्थेत आहे. पाण्याची चाचणी केली असता ते रासायनिक पाणी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रक्रिया करून ते पाणी किती शुद्ध होणार? त्यामुळे महापालिका नागरिकांना पाणी नाही तर विष पाजत असल्याचा आरोप नगरसेवकांनी मंगळवारी (दि. ५) सर्वसाधारण सभेत केला.
उन्हाळा सुरू असून शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिंदेसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे म्हणाले की, पवना नदीत सांडपाणी सोडण्यात येत आहे. रावेत बंधाऱ्याचे पाणी चाचणीसाठी घेऊन प्रयोगशाळात चाचणीसाठी देणार होतो. मात्र, त्यांनी पाण्याचे नमुने घेतले नाहीत. खासदारांचे पत्र दिले, तेव्हा एका प्रयोगशाळेने चाचणी केली. हे पाणी विषारी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.
संगीता ताम्हाणे म्हणाल्या की, शहरात पाण्याची टंचाई आहे. पाण्यात अळ्या असल्याचे वारंवार अधिकाऱ्यांना सांगितले आहे. श्रुती वाकडकर म्हणाल्या की, कमी दाबाने, अनियमित आणि अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक टँकरने पाणी खरेदी करीत आहेत.
सुलभा उबाळे म्हणाल्या की, आपण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहोत. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पाप केले आहे. पाण्यासाठी खर्च करा. शैलजा मोरे, कुशाग्र कदम, निखिल बोऱ्हाडे, संदीप वाघेरे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.
...तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही
जोपर्यंत पवना बंद जलवाहिनीचे काम होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचा सूर यावेळी नगरसेवकांनी आळवला. त्यासाठी शहरातील पाच आमदार, एक खासदार आणि १२८ नगरसेवकांनी प्रयत्न करावेत. पुणे महापालिका भामा-आसखेडचे पाणी आपल्यानंतर काम सुरू करून नेत असेल तर, आपल्याला का जमत नाही, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.