मंत्रीमहोदय, रोजच वल्लभनगर आगारास भेट देणार का ? बसस्थानकातील प्रवाशांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:33 IST2026-05-02T12:33:16+5:302026-05-02T12:33:30+5:30
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येणार म्हणून तामझाम, परिसर चकाचक; कचराकुंड्या रिकाम्या, प्रवेशद्वार सुरू; ‘पिणाचे पाणी’ फलक लागले

मंत्रीमहोदय, रोजच वल्लभनगर आगारास भेट देणार का ? बसस्थानकातील प्रवाशांचा सवाल
- आकाश झगडे
पिंपरी : परिवहन मंत्री भेट देणार म्हणून एका रात्रीत वल्लभनगर एसटी बसस्थानक चकाचक झालेले गुरुवारी (दि. ३०) सकाळी प्रवाशांना दिसले, यामुळे ‘मंत्रीमहोदय, तुम्ही रोजच वल्लभनगर आगारात भेट देणार का?’ असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर बसस्थानकास भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली.
चालक व वाहकांना विश्रांतीगृहामध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी, असे निर्देश त्यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे स्थानकातील कचराकुंड्या रिकाम्या होत्या. संत तुकारामनगरकडील प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. पाणपोयीवर ‘पिणाचे पाणी’ असे फलक लागले होते. स्थानक चकाचक करण्यात आले होते.
--------
एका रात्रीत अवतरल्या सोयीसुविधा
दरम्यान, बुधवारी (दि. २९) सायंकाळी ‘लोकमत’ने वल्लभनगर आगारात पाहणी केली होती. यावेळी पिण्याचे पाणी असणाऱ्या ठिकाणी ‘पिण्याचे पाणी’ असा फलक नव्हता. नवीन कूलर सुरू नव्हता व त्याला जाळी बसवलेली नव्हती. ‘नाथजल १५ रुपये’ असा फलकही लावलेला नव्हता. तुकाराम नगरकडील प्रवेशद्वार बंद होते. स्थानकातील कचराकुंड्या भरलेल्या होत्या, बसस्थानकात अस्वच्छता होती. मात्र, एका रात्रीत गुरुवारी (दि. ३०) सकाळी या सर्व गोष्टी अवतरल्या.
-------
गडबडीत डिंक कमी लागला!
परिवहन मंत्री पाहणीसाठी येणार असल्याची माहिती वल्लभनगर आगार प्रशासनाला कदाचित उशिरा मिळाली असावी. त्यामुळे घाईगडबडीत कमी डिंक लागल्याने ‘पिण्याचे पाणी’ असे लिहिलेला फलक पाहणी करून जाताच निघाला होता. साध्या कागदावर छपाई करून फलक चिटकवण्यात आले आहेत.
-------
प्रवेशद्वार उघडले, पण धुळीचे काय?
संत तुकाराम नगरकडील प्रवेशद्वार प्रवाशांसाठी उघडण्यात आले खरे, मात्र तेथे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. केवळ प्रवेशद्वार उघडून न थांबता तिथली धूळ आणि अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.