अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:16 IST2025-06-13T17:15:45+5:302025-06-13T17:16:44+5:30
ईददिवशीच आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, सोबत जेवणही केले, ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली, त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू
नेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) : ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला... पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे गुरुवारी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी सकाळी समजली आणि अवघे शहर सुन्न झाले.
इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. संत तुकारामनगर परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूलमध्ये तो दहावीपर्यंत, तर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. मुंबईत हवाई वाहतुकीतील तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो आधी विस्तारा कंपनीत आणि नंतर एअर इंडियात दाखल झाला. वडील समीर नूरमहंमद शेख यांचा पराठ्याचा व्यवसाय, तर आई तसलीम गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमीर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीस आहे.
बकरी ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन इरफान आठ दिवसांपूर्वी घरी आलेला. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा यांच्यासोबत ईद साजरी करून ९ जून रोजी मुंबई येथे कामावर गेला. गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात क्रू मेंबर म्हणून त्याची ड्यूटी होती. विमानात जाण्यापूर्वी आईला फोन करून त्याने निरोप दिला आणि काही वेळातच काळाने घात केला. त्यानंतर एअर इंडियाकडून त्याच्या घरी कळविण्यात आले. आई-वडील आणि मोठा भाऊ तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत्यांकडून ही बातमी परिसरात समजली. मनमिळाऊ स्वभावाच्या उमद्या तरुणाच्या मृत्यूने अवघ्या शहरावर शोककळा पसरली.
शंकेची पाल चुकचुकली आणि...
इरफान नेहमी विमानात बसण्यापूर्वी आईला फोन करून कळवत असे. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहताना आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घरातील सगळेच सैरभैर झाले. त्यानंतर काही वेळातच फोन आला आणि ती बातमी ऐकावी लागली.
इरफान सुटीवर आला की मला भेटायचा यायचा. ईददिवशीच आम्ही भेटलो होतो. गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. - फिरोज शेख, चुलते, संत तुकारामनगर