Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता
By विश्वास मोरे | Updated: January 28, 2026 20:37 IST2026-01-28T20:36:35+5:302026-01-28T20:37:52+5:30
पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची नियुक्ती अजित पवार यांनी केली होती.

Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाच्या दिवसांपैकी एक आहे. सामान्य माणसांची दुःख जाणणारा, शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता म्हणून ते मला भावले, असे सांगत होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि आयएएस राजेश पाटील.
पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची नियुक्ती अजित पवार यांनी केली होती. आठवण सांगताना राजेश पाटील म्हणाले, ' मला आजही स्पष्टपणे आठवतेय, आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्यानंतर मी थेट त्यांच्या दालनात गेलो आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी माझ्या धैर्याचे आणि धाडसाचे कौतुक केले आणि माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली. हा अनुभव मी सदैव जपून ठेवेन. ते नेहमीच सर्वांसाठी उपलब्ध असायचे, प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असायचे आणि भविष्याचा वेध घेणारे निर्णयक्षम नेते होते. त्या छोट्याशा कालावधीत मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. ते आपल्या काळातील सर्वात प्रेरणादायी राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. अशी व्यक्ती ज्यांच्यासोबत मला अत्यंत जवळून काम करण्याचे भाग्य लाभले.'
सार्वजनिक कल्याणासाठी दिलेला बिनशर्त पाठिंबा
राजेश पाटील म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोन, विकासाभिमुख विचार आणि लोककल्याणासाठी असलेली अढळ बांधिलकी खरोखरच अतुलनीय होती. त्यांची दृष्टी आणि विचारांमधील स्पष्टता इतकी प्रभावी होती की, त्यांच्या टीमचा हिस्सा बनण्यासाठी कोणीही नैसर्गिकरित्या प्रेरित व्हायचे. महाराष्ट्रातील माझा अल्पसा कार्यकाळ त्यांच्यामुळेच संस्मरणीय ठरला; त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्या क्षमतेवर ठेवलेला भरवसा आणि सार्वजनिक कल्याणासाठी दिलेला बिनशर्त पाठिंबा मी कधीही विसरणार नाही.'
प्रशाकीय शिस्त आणि हस्तेक्षेप नसे
राजेश पाटील म्हणाले, 'अजित पवार हे माझ्यासाठी एक आदर्श राजकीय नेते होते. ज्यांनी आपल्या लोकांसाठी कधीही माघार घेतली नाही. मी पिंपरी चिंचवड शहरात २४ लक्ष स्केअर फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी तक्रारी केल्या. मात्र, ते माझ्या पाठीशी उभे होते. व्यापक जनहितासाठी ते कोणाचीही तमा बाळगत नसत. ते उत्तम प्रशासक होते. त्यांना एखाद्या कामांसाठी तोच माणूस पुन्हा आल्याचे आवडत नसे. त्यांचा साधेपणा, निरागसपणा भावतो. प्रशासकीय शिस्त आणि काटेकोरपणा त्यांना आवडत असे. प्रशाकीय कामात त्यांचा हस्तेक्षेप नसे. त्यांचे जाणे हे राष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचे, आणि विशेषतः आमच्यासारख्या लोकांसाठी जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते, एक न भरून येणारे नुकसान आहे. त्यांचा वारसा सदैव टिकून राहो आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्वांना त्यांच्याकडून सार्वजनिक सेवेची मूल्ये आणि वचनबद्धता घेण्याची प्रेरणा मिळो. या महान सुपुत्राला हीच खरी श्रद्धांजली ठरेल.