'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'च्या सौंदर्यापुढं फोल ठरेल चीनची भिंत, एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:40 PM2021-03-23T14:40:54+5:302021-03-23T14:46:35+5:30

जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी...

देशातील पर्यटन स्थळांमध्ये राजस्थान हे सर्वात आवडतं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. राजस्थानमधील जुन्या वास्तू आणि किल्ले हे जगभरात ओळखले जातात. राजस्थानात अनेक प्राचीन किल्ले आहेत. अशाच एका सुंदर किल्ल्याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

राजस्थानातील कुम्भलगड किल्ल्याची भिंत पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण आहे. सौंदर्याच्याबाबत ही भिंत चीनच्या भिंतीपेक्षाही अव्वल दर्जाची आहे. कुम्भलगडाची ही भिंत भेदण्यात मुघलांनाही अपयश आलं होतं.

जागतिक वारसा हक्कांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार अतिशय विचार करुन तयार करण्यात आलेल्या भिंतीची सुरक्षा व्यवस्था देखील कमाल आहे.

कुम्भलगड किल्ल्याची भिंत जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत आहे. या भिंतीची लांबी सुमारे ३६ किमी इतकी आहे आणि भिंतीची रुंदी १५ ते २५ फूट इतकी आहे.

महाराणा कुम्भा यांच्या राज्यात १५ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ला तयार होण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला होता.

किल्ल्याच्या निर्मितीनंतर महाराणा कुम्भानं चलनातील नाण्यांवर किल्ल्याची प्रतिकृती कोरली होती.

किल्ल्याची भिंत डोंगराळ भागात खूप दूरवर पसरली आहे. किल्ल्याच्या जवळच एक जंगल देखील होतं. ते आता वाइल्ड लाइफ सेंच्युरी म्हणून परिवर्तन करण्यात आलं आहे.

कुम्भालगड किल्ला जयपूरमधील आमेर फोर्ट आणि जसलमैरमधील किल्ल्यांसारखा लोकप्रिय नसला तरी या किल्ल्याच्या भिंतीच्या वैशिष्ट्यामुळे तो जगभर ओळखला जातो.