धक्कादायक, २०३० पर्यंत देशात तब्बल ६८ लाख मुलींची होणार भ्रुणहत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 05:01 PM2020-08-22T17:01:21+5:302020-08-22T17:11:49+5:30

२०१७ ते २०३० या काळात भारतामध्ये गर्भात असलेल्या ६८ लाख मुलींचा जन्म होणार नाही असा धक्कादायक दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.

मुलगी नको या अट्टाहासातून देशात मुलींची होणारी भ्रूणहत्या हा चिंतेचा विषय आहे. मुलींच्या गर्भाची हत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन आणि कडक कायदे केल्यानंतरही असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

दरम्यान, २०१७ ते २०३० या काळात भारतामध्ये गर्भात असलेल्या ६८ लाख मुलींचा जन्म होणार नाही असा धक्कादायक दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एका अहवालामधून हा अंदाज बांधण्यात आला आहे. गर्भलिंगनिदानामध्ये गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात होणारे गर्भपात हे याचे कारण आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार संशोधकांचे म्हणणे आहे की २०१७ ते २०३० या काळात उत्तर प्रदेशमध्ये २० लाख कमी मुलींचा जन्म होणार आहे. म्हणजेच भारतातील मुलींची सर्वात कमी संख्या याच राज्यात पाहायला मिळू शकते. लोकसंख्येचा फर्टिलिटी रेट आणि मुलगाच हवा या आग्रहाच्या आधारावर संशोधकांनी देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा अभ्यास केला.

भारतातील उत्तरेकडील १७ राज्यांमध्ये मुलगा हवा हा आग्रह अधिक आहे. हा अभ्यास Plos One या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. दरम्यान,लैंगिक समानतेसाठी भारताला कठोर नियम लागू करावे लागतील, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.

भारतात १९९४ मध्येच गर्भलिंग निंदान बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. मात्र देशातील विविध भागांमध्ये हा कायदा लागू करण्याबाबत असमानता आहे. सध्या भारतात दर एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९०० ते ९३० महिला आहे.