Coronavirus News: देशात दिवसभरात १.७३ लाख कोरोनाबाधितांची नोंद; ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:33 AM2021-05-29T11:33:04+5:302021-05-29T11:46:06+5:30

Coronavirus News: २४ तासांत तब्बल २ लाख ८४ हजार ६०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात दिवसभरात १ लाख ७३ हजार ७९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी गेल्या ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ वर पोहचली आहे. देशात सध्या २२ लाख ९२८हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे.

देशातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. गेल्या २४ तासांत ३६१७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ वर पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या२ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ वर पोहचली आहे. तर याच २४ तासांत तब्बल २ लाख ८४ हजार ६०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात देखील दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५३ लाख ७ हजार ८७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे शुक्रवारी २० हजार ७४० रुग्ण आणि ४२४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४ टक्के झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली गेली आहे. सध्या २ लाख ८९ हजार ८८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.५७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १६ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ५६ लाख ९२ हजार ९२० कोरोना बाधित असून, मृतांची संख्या ९३ हजार १९८ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६४ टक्के आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १३३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ४२४ मृत्यूंमध्ये मुंबई ३०, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ३, पालघर ३, वसई-विरार मनपा २, रायगड ७, पनवेल मनपा ३, नाशिक १०, नाशिक मनपा ९, अहमदनगर २१, अहमदनगर मनपा २, जळगाव १, जळगाव मनपा २, नंदूरबार १, पुणे २६, पुणे मनपा १५, सोलापूर ४०, सोलापूर मनपा १, सातारा २४, कोल्हापूर ३६, कोल्हापूर मनपा २, सांगली ३२, सांगली-मिरज-कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १०, रत्नागिरी १४, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ९, जालना ६, हिंगोली १, परभणी २, लातूर १२, लातूर मनपा ३, उस्मानाबाद १६, बीड १७, नांदेड ४, नांदेड मनपा २, अकोला १२, अकोला मनपा २, अमरावती ८, अमरावती मनपा २, यवतमाळ २, वाशिम ५, नागपूर २, नागपूर मनपा १०, वर्धा १, भंडारा १, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.