CoronaVirus News : भारतात कोरोनाचा मृत्यूदर वाढतोय, मृतांच्या संख्येने ओलांडला 50 हजारांचा टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:10 PM2020-08-17T19:10:43+5:302020-08-17T19:35:20+5:30

भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 50,000 च्या वर गेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार भारतात मृत्यूची संख्या कमी असू शकते, परंतु जगातील सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांपैकी भारतातील कोरोना मृतांची संख्या वेगाने वाढत आहे.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजिनियरिंग (JHU CSSE) च्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, फक्त तीन देशात भारतापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 1.72 लाख, ब्राझीलमध्ये 1.07 लाख आणि मेक्सिकोमध्ये 56,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सौदी अरेबियाहून परत आलेल्या कर्नाटकातील 76 वर्षीय व्यक्तीने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि त्याचा 12 मार्च रोजी मृत्यू झाला होता. तेव्हा भारतातील हा पहिला कोरोनाचा मृत्यू म्हणून नोंद झाली होती.

सुरुवातीच्या दहा हजार कोरोना मृत्यूची नोंद करण्यात तीन महिन्यांहून अधिक वेळ लागला. परंतु शेवटच्या दहा हजार मृत्यूची नोंद करण्यासाठी मात्र अवघ्या दहा दिवसांचा कालावधी लागला.

भारतात दररोज सुमारे एक हजार मृत्यू होत आहेत. मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढ आहे. तितक्या वेगाने मृत्यूची संख्या वाढत नाही, कारण रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. पण, मृत्यूदर हळू हळू वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात दररोज मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात दररोज 100 हून अधिक मृत्यूची नोंद होत आहे.

17 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत भारतात 50,921 जणांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, काही प्रमाणात, कोरोना मृत्यूच्या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे.

भारतातील एकूण कोरोना प्रकरणांच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. या व्यतिरिक्त, भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात जास्त बाधित देशांमध्ये भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे.

भारतात कोरोना मृत्यूदर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. दर दहा लाख लोकसंख्येवर 36 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आहे.

मात्र, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्राफ अद्याप खाली येत असल्याचे दिसून येत नाही. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज सरासरी जास्त मृत्यूची नोंद होत आहे, पण भारतातही मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे.

भारतात दर 34 दिवसांनी मृत्यूची संख्या दुपटीने वाढत आहे, तर ब्राझीलमध्ये मृत्यूची संख्या 84 दिवसात आणि अमेरिकेत 113 दिवसांत दुप्पट होत आहे.