असे केंद्रीय मंत्री, ज्यांचा मुलगा पाकिस्तानकडून युद्ध लढलेला; लाल बहाद्दूर शास्त्रींनाही झुकावे लागलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:33 PM2023-01-24T17:33:58+5:302023-01-24T17:45:56+5:30

देशप्रेम काय असते? डोळ्यात अश्रू तरळतील... सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेत अधिकारी होते, कुटुंबाच्या विरोधात जात भारत निवडला, पण पुढे जे घडले...

भारतात एक असे नेता होऊन गेले ज्यांना भारत-पाकिस्तान युद्धाची मोठी झळ सोसावी लागली होती. चारवेळा मेरठहून खासदार झाले, पण मंत्रिपद सोडावे लागले. देशप्रेम काय असते? आझाद हिंद सेनेचा सैन्याधिकारी, ब्रिटिशांच्या सैन्याविरोधात राजद्रोह केल्याचा खटला, जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी पाकिस्तानऐवजी भारताला निवडले. कुटुंबाने भारतात येण्यास नकार दिला...

या धडाकेबाज नेत्याचे नाव होते शाहनवाज खान. त्यांची स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथानकाला साजेशी आहे, तेवढीच भावनिक. आज त्यांची जयंती आहे. 1952 मध्ये मेरठमध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली तेव्हा त्यांचे कुटुंब आणि मुले पाकिस्तानात होते. खरे तर त्यांनी स्वतः भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानातून भारतात येण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

1952 मध्ये जेव्हा ते मेरठमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवत होते, तेव्हा शहराने त्यांचे स्वागत केले, कारण ते भारतीय लष्कराचे एक महान सेनानी होते आणि त्यांनी पाकिस्तानऐवजी भारतात आपले आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे दुर्दैव एवढे की त्यावेळी त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात भरती झाला होता. शाहनवाज भारतीय राजकारणात पायऱ्या चढत असताना पाकिस्तानी सैन्यात मुलगा बड्या पोस्टवर गेला होता.

शाहनवाज यांनी 1952 ते 1962 या काळात मेरठमधून सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या. 67 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण 1971 मध्ये ते पुन्हा मेरठमधून विजयी झाले. केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री झाले.

शाहनवाज यांचा जन्म रावळपिंडी जिल्ह्यातील माटोर गावात झाला होता. पुढे ते ब्रिटीश सैन्यात कॅप्टन झाले. परंतू जेव्हा ते आझाद हिंद फौजेत सामिल झाले तेव्हा खरे प्रकाशझोतात आले. फौजेत मेजर जनरल होते आणि नेताजींच्या जवळच्या लोकांमध्ये होते. आझाद हिंद फौजेने शरणागती पत्करली तेव्हा ब्रिटीश सैन्याने त्यांना पकडले आणि लाल किल्ल्यावर ठेवले. कोर्ट मार्शल झाले. यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची बाजू मांडली.

लाल किल्ल्यावर ब्रिटीश राजवटीचा झेंडा उतरवून पहिला तिरंगा फडकवणारे जनरल शाहनवाज होते. आजही लाल किल्ल्यावर रोज संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या लाईट अँड साऊंड कार्यक्रमात नेताजींसोबत शाहनवाजचा आवाजही ऐकू येतो. शाहनवाज खान यांचे संपूर्ण कुटुंब रावळपिंडीतच राहत होते. त्यांना तीन मुलगे आणि तीन मुली होत्या. स्वातंत्र्याच्या वेळी देशाची फाळणी झाली तेव्हा भारतावरील प्रेमामुळे ते इथे आले. त्याचे कुटुंब येथे आले नाही. एका मुलाला घेऊन ते भारतात आले.

जवाहरलाल नेहरूंनीही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. ते दीर्घकाळ केंद्रीय मंत्री होते. शाहनवाझ यांच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडली. १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. तेव्हा शाहनवाज लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते. शाहनवाज यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याचे नाव महमूद नवाज अली होते. अचानक भारतात शाहनवाज यांच्याविरोधात लाट तयार होऊ लागली.

ही गोष्ट देशात आगीसारखी पसरली. विरोधकांनी शाहनवाज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शाहनवाज यांच्यावर इतका दबाव आला की त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यावर दबाव येऊ लागला. त्यानंतर शास्त्रींनी त्यांचा बचाव तर केलाच पण राजीनामा स्वीकारण्यासही नकार दिला. विरोधकांनाही ठणकावले होते.

शाहनवाझ यांचा मुलगा शत्रू देशाच्या सैन्यात मोठा अधिकारी असेल तर त्यांचा दोष काय? असा सवालही शास्त्रींनी केला होता. शाहनवाझ यांनी मनावर दगड ठेवून अखेर राजीनामा दिला. ते पाकिस्तान सोडल्यानंतर मुलाला कधी भेटले देखील नव्हते. परंतू, त्या कारणासाठी त्यांना कुर्बानी द्यावी लागली. महमूद नवाज निवृत्त झाल्यावर शाहनवाझना भेटण्यासाठी भारतात आला होता.

1983 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी नवी दिल्ली येथे शाहनवाझ यांचे निधन झाले. आता त्यांच्या स्मरणार्थ जनरल शाहनवाज मेमोरियल फाउंडेशन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करते. या फाउंडेशनचे मुख्यालय नवी दिल्लीतील जामिया मिलिया भागात आहे.