१४ एकरात आश्रम, ३ वर्षात कोट्यवधीचं साम्राज्य; शेतकरी नेता कसा बनला करौली बाबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:31 AM2023-03-22T09:31:23+5:302023-03-22T09:36:15+5:30

उत्तर प्रदेशात कानपूर इथं एका बाबाची जोरदार चर्चा आहे. त्यांचं नाव आहे संतोष सिंह भदौरिया उर्फ करौली बाबा, करौली बाबा यांच्यावर एका भक्ताला बाऊन्सरकडून मारल्याचा आरोप आहे. हा भक्त नोएडा येथील डॉक्टर आहे. या प्रकरणी FIR नोंद झाला आहे.

संतोष सिंह भदौरिया मूळचे उन्नावच्या बारह सगवर येथील आहेत. उत्तर प्रदेशासह देशात महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन गाजत होते. त्यावेळी किसान यूनियन नेते संतराम सिंह यांची हत्या झाली. तेव्हा संतोष सिंह भदौरिया यांना टिकैत यांनी सरसोल परिसराची जबाबदारी दिली. शेतकरी आंदोलनात पोलिसांसोबत ते भिडले होते.

शेतकरी नेते संतोष सिंह भदौरिया यांनी काही शेतकऱ्यांना पोलीस कोठडीतून सोडवले. त्यानंतर शेतकरी आंदोलनातून त्यांचे नशीब पालटले. संतोष सिंह भदौरिया जेव्हा शेतकरी नेते होते तेव्हा जाजमऊ फ्रेंड्स कॉलनीत कुटुंबासह राहायचे.

या आंदोलनातून संतोष सिंह भदौरिया प्रसिद्ध झाले. त्यांची जवळीक यूपीए काळात केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्याशी वाढली. त्यांना कोळसा नियामक आयोगाचे चेअरमन बनवण्यात आले. मात्र काही काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना पदावरून हटवले. त्यानंतर संतोष सिंह भदौरिया बेपत्ता झाले. त्यानंतर आता करौली आश्रम बनवल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले.

संतोष सिंह भदौरिया यांनी करौली इथं काही जमीन खरेदी केली. ज्यात त्यांनी शनीदेवाचे मंदिर बनवले. त्यानंतर आणखी जमीन खरेदी करत करौली आश्रम बनवले. या आश्रमात आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू केले. आसपासच्या गावातील लोकांवर आयुर्वेदिक उपचार करू लागले. त्यानंतर आश्रमात कामाख्या देवी मंदिर बनवले.

संतोष सिंह भदौरिया यांच्यासोबत गुरू राधा रमण मिश्राही राहू लागले. तंत्रमंत्रच्या सहाय्याने लोकांच्या अडचणी दूर करण्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे संतोष सिंह भदौरिया प्रसिद्ध झाले. त्यानंतर गुरू राधारमण यांच्या मृत्यूनंतर संतोष सिंह भदौरिया करौली बाबा म्हणून नावारुपाला आले.

यूट्यूबच्या माध्यमातून करौली बाबाने प्रचार सुरू केला. पाहता पाहता करौली आश्रमावर पैशांचा पाऊस झाला. ३ वर्षात कोट्यवधीचं साम्राज्य उभं राहिले. १४ एकरमध्ये करौली आश्रमचा विस्तार झाला. दर दिवशी इथं ३-४ हजार लोक येतात. कार्तिक पोर्णिमेला विशेष कार्यक्रमाचं आयोजन होते.

भक्तांना भेटण्यापूर्वी करौली बाबा कामाख्या देवीची पूजा करतात. त्यानंतर आशीर्वाद देत प्रवचन करण्यास बसतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना सर्वात आधी १०० रुपयांची पावती फाडावी लागते. त्यानंतर ५ हजारांहून अधिक खर्च आश्रमात येतो. आश्रमात प्रत्येक वेळी हवन केला जातो.

करौली बाबा यांच्याकडून हवन करण्याचा खर्च ५० हजार ते १ लाखापर्यंत आहे. जर विशेष काही करायचे असेल तर खर्चाची मर्यादा नाही. आश्रमात पूजा साहित्याचे दुकान आहे. हवनसाठी लागणारे साहित्य तिथूनच घ्यावे लागते.

आश्रमात बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. जे लोक आश्रमात प्रवेश करतात त्यांना १०० रुपये पावती फाडावी लागते. जो भक्त ९ दिवस आश्रमात थांबून हवन करेल त्याला मंत्र दिला जातो त्यामुळे त्याची सर्व इच्छा पूर्ण होते असा दावा आश्रमातून केला जातो.