शिंदे गट आक्रमक! उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार? शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे समर्थक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 09:51 AM2022-08-08T09:51:11+5:302022-08-08T09:59:07+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या सर्वोच्च समितीतील बहुतांश मंडळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने असून, उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती चूक चांगलीच महागात पडू शकेल? जाणून घ्या...

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच पक्ष संघटना वाचवण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावला असून, सुपुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) राज्यभर दौरे करत आहेत. यातच शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा आणि शिवसेनेला मोठ्या प्रमाणात लागलेली गळती ही पक्षप्रमुखांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेचे धनुष्यबाण त्यांच्याकडेच राहण्याची वा ते गोठवले जाण्याची जी काही शक्यता चर्चिली जात होती, ती केवळ चर्चाच ठरणार असून, हे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडेच येईल, असा मोठा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडूनही असाच दावा करण्यात येत असून, नेमके कोणाच्या दाव्यात तथ्य आहे ते लवकरच उघड होईल, असे सांगितले जात आहे.

शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधी मंडळातील २८२ प्रतिनिधींपैकी जवळपास १७० जणांचे एकनाथ शिंदे गटाला समर्थन असल्याची एकीकडे शिंदे गटासाठी जमेची बाजू असताना, दुसरीकडे शिवसेनेने आपल्याच पक्षाच्या घटनेच्या दुप्पट पदांवर नियुक्त्या केल्या असून, याची काहीच माहिती निवडणूक आयोगाला कळवली नसल्याने याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.

आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जाणारा दावा हा केवळ राजकीय रणनितीचा भाग नसून, ती वस्तुस्थिती असल्याचा दावा शिंदे गटातील एका समर्थक आमदाराने केला आहे. शिवसेनेत उभी फूटच पडली असून, २८२ जणांच्या प्रतिनिधी मंडळात जवळपास १७०पेक्षा अधिक प्रतिनिधींचे शिंदे यांना समर्थन असा गौप्यस्फोटही करण्यात आला आहे.

तसेच अनेक नियुक्त्यांबाबत निवडणूक आयोगाला संघटनेने कळवलेले नाही. शिवसेनेच्या घटनेच्या विपरित दुप्पट पदांवर नियुक्त्या केल्या असून, निवडणूक आयोगाकडे शिंदे यांचीच सरशी होणार यात वाद नाही, असेही म्हटले जात असून, ज्या चिन्हावरून विविध तर्क लढवले जात आहेत, ते चिन्ह सुरुवातीला आयोग गोठवण्याची शक्यता असली, तरी अंतिमतः चिन्ह शिंदे यांनाच मिळेल कारण बहुमतानुसार शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत ठरेल, इतक्या जणांचे त्यांच्याकडे समर्थन आहे, असेही सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या नऊ नेत्यांपैकी सहा नेत्यांचे शिंदे यांना समर्थन असून, तसे पत्रच शिंदे यांच्याकडे आहे. यातील स्वतः एकनाथ शिंदे, रामदास कदम हे दोन नेते असून उर्वरित चार नेते कोण हे देखील योग्यवेळी तुमच्यासमोर येईल. बाळासाहेबांपासून संघटनेत कार्यरत असलेल्या दोन मोठ्या नेत्यांनी शिंदे यांना समर्थन व आशीर्वाद तर दिलेच आहेत. मात्र, त्यांनी तोंड उघडायचे ठरवले, तर मोठा राजकीय स्फोट होईल, असे एका माजी मंत्र्याने सांगितले.

१८ उपनेत्यांपैकी ११ उपनेते शिंदे यांचे समर्थन करत असल्याचाही माहिती या आमदाराने दिली. तसेच जिल्हाध्यक्षांची संख्या शिवसेनेच्या घटनेनुसार ३५ असायला हवी ती ९४ आहे. तोच प्रकार विभागाध्यक्षांबाबतही झालेला असून, हे शिवसेनेच्या घटेनेच्या विपरित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी कागदोपत्री पुरावे देऊन मांडल्या जाणार आहेत.

शिवसेनेमध्ये प्रतिनिधी मंडळ ही सर्वोच्च समिती असून, यात शिवसेना नेते, शिवसेना उपनेते, जिल्हाध्यक्ष व आमदार, खासदार असतात. यातील बहुतांश प्रतिनिधी हे शिंदे यांच्यासोबतच असल्याने एखाद्या संघटनेत बहुमताने नेतृत्व बदल करणे हा संघटनात्मक लोकशाही हक्क असल्याचा दावाही संबंधित आमदाराने केला आहे.

शिंदे गटाकडून असा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात त्यात किती तथ्य आहे किंवा कसे हे निवडणूक आयोग किंवा न्यायालयच ठरवू शकते, असे सांगितले जात आहे. तसेच याच प्रकारचा प्रतिदावा शिवसेनेतीलही (उद्धव ठाकरेसमर्थक) अनेक जण करत असल्याने भविष्यात हा वाद टोकाला जाणार असल्याचाच अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे.

जिल्हाध्यक्षांची संख्या शिवसेनेच्या घटनेनुसार ३५ असायला हवी ती ९४ आहे. तोच प्रकार विभाग अध्यक्षांबाबतही झालेला आहे. शिवसेनेच्या घटेनेच्या हे विपरित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी कागदोपत्री पुरावे देऊन मांडल्या जाणार आहेत.