हे प्रतिक आहे जिद्दीचं, पाहणी दौऱ्यात शरद पवारांच्या हाती कवड्याची माळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 03:08 PM2020-10-18T15:08:44+5:302020-10-18T15:27:29+5:30

अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जमीनच खरवडून गेल्याचे अनेक ठिकाणी दिसले.

शेतकऱ्यांचे हे नुकसान एका दिवसात भरुन येणारे नाही. मात्र, मदतीसाठी राज्य सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्रानेही मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी तुळजापूर व लोहारा तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती उस्मानाबादसोबतच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे ते म्हणाले.

पवार हे उस्मानाबाद दौऱ्यावर असल्याने महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्यात होते, त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी कवड्याची माळ देऊन त्याचं स्वागत केलं.

पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते, यावेळी ना हार, ना फुले दिसली. पण, पवारांच्या हातातील कवड्याची माळ लक्षवेधी ठरली.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन शरद पवार यांच्या हातात कवड्याची माळ असलेला फोटो शेअर केला आहे

ही हातातील माळ खूप काही सांगते, हे प्रतिक आहे जिद्दीचं, विश्वासाचं, आव्हानाचं, शुन्यातून स्वराज्य निर्माण्याचं, लोककल्याणाचं आणि रयतेच्या निर्वाज्य प्रेमाचं

कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या माळेची महती सांगताना, पवारांच्या जिद्दीचं आणि नेतृत्वाचं कौतुक केलंय.

पवारांनी आपल्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचं गाऱ्हाण ऐकून घेतलं. तसेच, मदतीचं आश्वासनही शेतकऱ्यांना दिलंय.