Indian Railway: ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं, तुम्हालाही आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:27 AM2022-02-18T10:27:43+5:302022-02-18T10:51:55+5:30

Indian Railway: ट्रेनमधून पंखे चोरीला जाऊ शकत नाहीत, यामागे रेल्वेचे खास तंत्रज्ञान आहे. जाणून घ्या या तंत्रज्ञानाबद्दल माहिती.

भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. पूर्वी ट्रेनमध्ये चोरीच्या घटना खूप होत असत.

चोरटे रेल्वेतून पंखे, बल्ब आदी वस्तू चोरून नेत. पूर्वीच्या काळी ट्रेनमधून पंखे चोरीला जाणे सामान्य होते. यानंतर रेल्वेने यावर उपाय शोधला, आता चोरांना इच्छा असूनही ट्रेनचा पंखा चोरता येत नाही.

चोरीच्या वाढत्या घटना पाहता रेल्वेने एक शक्कल लढवली आणि एक अनोखा पंखा तयार केला. ट्रेनमध्ये बसवला जाणारा पंखा आपल्या घरातील सामान्य पंख्यासारखा नसतो.

ट्रेनमधला पंखा घरात लावला तर तो चालू शकत नाही. हा अनोखा डिझाइन असलेला पंखा फक्त ट्रेनमध्ये बसवल्यावरच फिरतो. यामुळेच आता चोरटे हा पंखा चोरत नाहीत.

साधारणपणे आपण घरांमध्ये दोन प्रकारची वीज वापरतो. फर्स्ट एसी (अल्टरनेटिव्ह करंट) आणि सेकंड डीसी (डायरेक्ट करंट). जर घरामध्ये एसी वीज वापरली जात असेल तर जास्तीत जास्त वीज 220 व्होल्ट असते.

डीसी वापरला जात असेल, तर वीज 5, 12 किंवा 24 व्होल्टची असते. पण, गाड्यांमध्ये बसवलेले पंखे 110 व्होल्टचे बनलेले असतात, जे फक्त डीसीवर चालतात.

घरांमध्ये वापरलेली डीसी पॉवर 5, 12 किंवा 24 व्होल्टपेक्षा जास्त नसते, त्यामुळे तुम्ही हे पंखे तुमच्या घरात वापरू शकत नाही. त्यामुळे ट्रेनमध्ये बसवलेले पंखे ट्रेनमध्येच चालू शकतात.

त्यामुळे हे पंखे चोरणे लोकांसाठी निरुपयोगी आहे. हे पंखे कोणी चोरून नेले तरी त्याचा उपयोग फक्त भंगारमध्ये घालण्यासाठीच होईल. पण, रेल्वे विभागाशी संबधीत वस्तू भंगारवालेही घेत नाहीत, कारण हा एक दंडनीय अपराध आहे.

ट्रेन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. यामध्ये चोरी करणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणे होय. असे केल्यावर आरोपीविरुद्ध कलम 380 कलमाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडही ठोठावला जातो. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीनही मिळत नाही.