Diwali 2021: फटाके फोडण्याच्या प्रथेला सुरुवात कशी झाली? वाचा धमाकेदार कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 08:25 AM2021-11-02T08:25:45+5:302021-11-02T08:40:51+5:30

Firecrackers : विविध आकाराचे फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. एरवीही वर्षभर या ना त्या कारणाने फटाके चर्चेत असतातच. मात्र, दिवाळीत त्यांना खास मागणी असते.

सर्वत्र दिवाळीचा माहोल आहे. आकाशकंदिल आणि फराळाबरोबरच फटाक्यांची दुकानेही सजली आहेत. विविध आकाराचे फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. एरवीही वर्षभर या ना त्या कारणाने फटाके चर्चेत असतातच. मात्र, दिवाळीत त्यांना खास मागणी असते. फटाकेबंदीची मागणीही सालाबादप्रमाणेच असते. एकूणच फटाके हा विषय उत्सुकतेचा आहे.

सुमारे २२०० वर्षांपूर्वी चीनच्या लुईयांग प्रांतात फटाके फोडण्याच्या प्रथेला सुरुवात झाली. हे फटाके म्हणजे बांबूच्या छड्या असत ज्या आगीत टाकल्यानंतर त्यातील गाठींचा आवाज येत असे. सणसमारंभावेळी चीनमध्ये फटाके फोडण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली.

भारतात फटाक्यांचा पहिला कारखाना १९२३ मध्ये नाडर बंधूंनी कोलकात्यात आगपेटीच्या फॅक्टरीत फटाक्यांची निर्मिती केली. १९४० मध्ये शिवकाशी येथेही फटाक्यांचा कारखाना स्थापन करण्यात आला. भारतभरात तामिळनाडूतील शिवकाशी येथील फटाके प्रसिद्ध आहेत.

युरोपीय इतिहासकारांच्या मते सुरुंगांचे सूत्र सर्वप्रथम रॉजर बेकर या रसायनतज्ज्ञाने शोधले. १३व्या आणि १५व्या शतकात फटाक्यांचा चीनमधून जगभर प्रसार झाला. युरोपात फटाक्यांना भरपूर लोकाश्रय मिळाला. युरोपनंतर अमेरिकेत फटाके पोहोचले. तिथे पहिल्या स्वातंत्र्यदिनी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

भारतात मुघलांच्या काळात १५२६ मध्ये तोफांचा वापर झाला. बाबराने दिल्लीच्या सुलतानावर हल्ला चढवताना तोफांचाच वापर केला. त्यावेळी अनेक सैनिक पळून गेले. तत्पूर्वी १५१८ मध्ये गुजरातेतील एका विवाहसोहळ्यात फटाक्यांचा वापर झाल्याचा उल्लेख आहे. वस्तुत: १४४३ मध्ये विजयनगरचे राजे देवराय द्वितीय यांच्या काळात महानवमीच्या सणाला आतषबाजी झाल्याचे नमूद आहे.

२०२० मध्ये ३००० कोटी रुपयांचे फटाक्यांचे उत्पादन झाले. तर २०२१ मध्ये १५०० कोटी रुपये फटाक्यांचे उत्पादन झाले. मात्र, फटाक्यांवरील बंदीमुळे यंदा ५०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.