India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 06:03 PM2020-06-17T18:03:17+5:302020-06-17T18:26:07+5:30

लडाखमधील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 16 जूनला भारत आणि चिनी सेन्यात हिंसक झटापट झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. मात्र, चीनला भारतापेक्षाही मोठी किंमत चुकवावी लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 40हून अधिक सैनिक या झटापटीत मारले गेले आहेत. यात त्यांच्या कमांडिंग ऑफसरचाही समावेश आहे. आता अमेरिकन गुप्तचर संस्थेनेही यासंदर्भात दावा केला आहे.

अमेरिकेची न्यूज वेबसाइट U.S Newsने अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या हवाले म्हटले आहे, की लडाखच्या गलवान भागात भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या हिंसक झटापटीत चीनचे तब्बल 35 सैनिक मारले गेले. यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही पक्षांत बैठक झाली होती. सीमेवर शांतता राखण्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी सहमतीही दर्शवण्यात आली होती. असे असतानाच भारत आणि चिनी सैन्यात ही हिंसक झटापट झाली.

अमेरिकन न्यूज वेबसाइटने गुप्तचर संस्थेच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की हिंसक चकमकीदरम्यान चिनी सैनिकांनी काटेरी दंड आणि चाकूने हल्ला केला होता. तर काही सैनिकांचा मृत्यू खोल दरीत कोसळून झाला आहे.

चिनी जनतेपुढे अपमानित व्हावे लागू नये म्हणून, चीन सरकार अद्याप हे स्वीकारायला तयार नाही. कोरोना संकटामुळे आधीच राष्ट्रपती शी जिनपिंग यांची लोकप्रियता ढासळली आहे, असेही या न्यूज वेबसाइटने म्हटले आहे.

भारतीय वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात हिंसक झटापट झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका आणि स्ट्रेचर्सवरून जखमी आणि मृत चिनी सैनिकांना नेण्यात आले.

या हल्ल्यात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले अथवा जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, चीनने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चिनी सैन्याचेही नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. मात्र कसल्याही प्रकारचा आकडा जाहीर केलेला नाही.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनबरोबरचा तणाव वाढतच चालला आहे. लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे, की कालपासून सुरू असलेल्या चर्चेचा विशेष परिणाम झालेला नाही. सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. चर्चा करूनही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. केवळ लडाखच नाही, तर एलएसीवर इतर भागांतही लष्कर अलर्ट मोडवर आले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चिनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय लष्कराने मंगळवारी एक निवेदन जारी करून गलवान खोऱ्यात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे सांगितले होते. आम्ही त्यांच्या कुटूंबीयांप्रती शोक व्यक्त करतो.