चीनला पाकिस्तानचा दणका; टिकटॉकवर घातली बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 09:06 PM2020-10-09T21:06:36+5:302020-10-09T21:21:16+5:30

इस्लामाबाद : मित्र असलेल्या पाकिस्ताननेही आता चीनला धक्का दिला आहे. चिनी अॅप टिकटॉकवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. पाकिस्तानमधील जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकने पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने याआधी सुद्धा टिकटॉकला अश्लील व्हिडिओबाबत समज दिली होती, अश्लील व्हिडिओवर कारवाई करण्याची सूचनाही प्राधिकरणाने दिली होती. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे ही बंदीची कारवाई करण्यात आली.

याचबरोबर, टिकटॉकने आपल्या अॅपवरील कंटेंटमध्ये सुधारणा केल्यास पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाकडून बंदी मागे घेण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

टिकटॉक व इतर सोशल मीडिया अॅपमुळे समाजात अश्लीलता पसरत असल्याचा दावा करण्यात येत होता. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने याआधी पाच डेटिंग अॅप्सवर बंदी घातली. या अॅप्समुळे अश्लीलता आणि समलैंगिकता पसरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधानदेखील टिकटॉकवरून जाणाऱ्या अश्लील कंटेटबाबत चिंतेत होते. समाजात सोशल मीडिया, अॅप्सद्वारे फैलावणाऱ्या अश्लीलतेला रोखण्यासाठी एक व्यापक रणनिती हवी आखणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले होते.

समाजात अश्लीलता वाढल्यानंतर महिलांविरोधात गुन्हे वाढतात आणि कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळेच समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या टिकटॉक सारख्या अॅप्सवर बॅन आणण्याची आवश्यकता असल्याचे काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी म्हटले असल्याचा दावा पाकिस्तानच्या माहिती मंत्री शिबली फराज यांनी एका मुलाखती दरम्यान केला होता.

दरम्यान, भारताने सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

भारतात बंदी घालण्यात आलेले चिनी अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करण्याची शक्यता होती. त्यामुळे भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक अॅप्सची यादी आधीच केंद्र सरकारला दिली होती.

यानंतर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर या अॅप्सची माहिती घेतली. हे अॅप्स धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.