Sri Lanka Crisis : बटाटे २०० रुपये किलो, अंडी ३६० रुपये डझन, दूध पावडर १९०० रुपये; मोठ्या संकटात श्रीलंका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 11:16 PM2022-04-03T23:16:00+5:302022-04-03T23:35:15+5:30

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आर्थिक संकट अधिकच वाढत चाललं आहे. देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत आहेत.

श्रीलंकेतील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. देशात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईची स्थिती अशी आहे की, देशात बटाट्याचे दर २०० रुपये (Sri Lankan Rupee) प्रति किलोवर पोहोचला आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. देशात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईची स्थिती अशी आहे की, देशात बटाट्याचे दर २०० रुपये (Sri Lankan Rupee) प्रति किलोवर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे दुधाचा पुरवठा होत नसून एक किलो दुधाच्या पावडरचा दर १९०० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे अंड्याचे दरही ३६० रुपये डझन इतके झाले आहे.

देशात एक किलो तांदळाचा भाव ५०० रुपयांवर पोहोचला आहे. खोबरेल तेलाची किंमत ८५० रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर साखर अडीचशे रुपये किलोने मिळतेय. मिरची ७०० रुपये किलोने विकली जात आहे. तर दुसरीकडे १ कप चहासुद्धा १०० रुपयांना आणि ४०० ग्रॅम दुधाचे पाकीट ७९० रुपयांना मिळतेय.

सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. तर जनताही मोठ्या चिंतेत आहे. येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढण्याची लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे लोक खूप तणावाखाली आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारत संकटमोचक म्हणून धावून आला आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं या वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेला २५० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १९ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे.

आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शनिवारीच भारतानं ४० हजार मेट्रिक टन डिझेलची खेप श्रीलंकेला पाठवली. भारताकडून अशी ही चौथी मदत आहे. गोपाल बागले म्हणाले की, या चार खेपांमध्ये १५०,००० मेट्रिक टनांहून अधिक जेट इंधन, डिझेल आणि पेट्रोल श्रीलंकेला नेण्यात आले आहे.

भारतानं श्रीलंकेला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचं मान्य केलं आहे. यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे.

अशा परिस्थितीत भारतातून तांदळाची खेप श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तिथल्या तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे, ज्याचे दर गेल्या वर्षभरात दुपटीनं वाढले आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) चर्चा करत आहे.

दरम्यान, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली देशात आणीबाणी जाहीर करणे ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची सबब ठरू नये, असा इशारा लंडनच्या मूलभूत हक्कांवर देखरेख ठेवणाऱ्या अॅम्नेस्टी वॉचडॉगने श्रीलंका सरकारला दिला. श्रीलंकेत देशव्यापी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंकेत विजेच्या भीषण संकटामुळे महागाई शिगेला पोहोचली आहे.