बापरे! जगातील 4 कोटी मुलांना गोवरचा धोका; WHO चा गंभीर इशारा, पालकांच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 05:53 PM2022-11-24T17:53:26+5:302022-11-24T17:59:42+5:30

जगातील 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही.

जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसची लस घेण्याच्या प्रक्रियेत जग इतके व्यस्त झाले की जगभरातील मुलांच्या लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे. अनेक देशांच्या लसीकरण कार्यक्रमाची पायाभूत सुविधा कोविड लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात व्यस्त होती. त्यामुळे आता गोवरने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून धोका वाढला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही, तर 1.5 कोटी मुलांना दुसरा डोस मिळू शकलेला नाही.

2021 मध्ये गोवरची सुमारे 90 लाख प्रकरणे नोंदवली गेली आणि 1 लाख 28 हजार मृत्यूची नोंद झाली. 22 देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. प्रथम कोरोना व्हायरसच्या लसीकरणामुळे गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि नंतर 2022 पर्यंत जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याच्या नादात 18 देशांमध्ये 6 कोटी डोस एकतर चुकले किंवा त्याला विलंब झाला आहे. गोवरचा व्हायरस हा सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानला जातो. पण चांगली गोष्ट ही आहे की लसीकरणाद्वारे हा रोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

हा व्हायरस पसरू नये म्हणून, जगातील 95% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळणे आवश्यक मानले जाते. परंतु प्रत्यक्षात फक्त 81% मुलांना गोवरचा पहिला डोस मिळाला आहे आणि फक्त 71% मुलांना दोन डोस मिळाले आहेत. 2008 नंतर इतक्या कमी लसीकरणाची नोंद झाली आहे.

गोवर आजार हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पसरतो. म्हणूनच जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन लसीकरण वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत गोवराची भीती आहे. या आजाराने मंगळवारी एका आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मुलांमध्ये गोवर संसर्गाची 200 हून अधिक पुष्टी झालेली प्रकरणे आहेत. तर तीन हजारांहून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. गोवर आणि रुबेलाचे वाढते रुग्ण आणि मृत्यू यावर केंद्राने राज्यांना एडवायजरी जारी केलं आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड आणि केरळमध्ये देखील प्रकरणे आहेत.

महाराष्ट्रात बालकांच्या मृत्यूच्या घटनांची नोंद झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. गोवर लसीकरणाचे प्रमाणही महाराष्ट्रात खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान प्रकरणे वाढू शकतात असा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हा आजार पसरला आहे, तेथे लहान मुलांमध्ये ताप आणि पुरळ असल्यास सावध राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गोवराचा प्रादुर्भाव 6 महिने ते 5 वर्ष वयोगटात सर्वाधिक आढळतो. गेल्या काही वर्षात त्याहून मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये गोवराचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. मुलामुलींमध्ये गोवर सारख्याच प्रमाणात आढळतो. लसीच्या मात्रा योग्य प्रमाणात घेतल्यास गोवरापासून संरक्षण मिळते.

संसर्ग झाल्यापासून दहा दिवसानंतर ताप, नाक गळणे, शिंका, पडसे, खोकला, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे व कधीकधी डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. उलटी, जुलाब होऊ शकतात. प्रत्यक्ष पुरळ येण्याच्या एक-दोन दिवस आधी गालाच्या आतल्या बाजूस मिठाच्या खड्यासारखे ठिपके दिसतात.