Health Care: उन्हाळ्यात 'या' फळांचे सेवन कराल तर डिहायड्रेशनपासून मुक्त व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:59 AM2024-03-29T10:59:53+5:302024-03-29T11:02:42+5:30

Summer Tips: उन्हाच्या झळा हळू हळू जाणवू लागल्या आहेत, अशातच एप्रिल, मे आणि जूनचा पंधरवडा काढायचा आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर होणारा दुष्पपरिणाम टाळण्यासाठी आहारात आवश्यक बदल करायला हवे. उन्हाळ्यात मुख्यत्वे त्रास होतो, तो म्हणजे डिहायड्रेशनचा! शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील इतर क्रिया मंदावतात, थकवा येतो, चक्कर येते, डोकेदुखी वाढते. त्यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखावा लागतो. मात्र काही जणांना भरपूर पाणी प्या म्हटल्यावर पोटाला तड बसते. अशा वेळी पाण्याची पातळी वाढवण्यासाठी फलाहार करण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. तर या कालावधीत कोणती फळे शरीरासाठी लाभदायक ठरतात ते पाहू.

अननस : उन्हाळ्यात तुम्ही अननसाचे सेवन करू शकता. हे एक रसाळ फळ आहे ज्यामध्ये भरपूर पाणी असते. हे व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्याचबरोबर त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनालाही फायदा होतो.

पीच : उन्हाळ्यातही तुम्ही पीचचे सेवन करू शकता. त्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. त्याचबरोबर शरीराला हायड्रेट देखील ठेवते.

बेलफळ : बेल ज्याला आपण वुड ऍपल म्हणून ओळखतो ते उन्हाळ्यात देखील खाऊ शकतो. हे एक अतिशय ताजेतवाने फळ आहे. त्याचा स्वभाव खूप थंड आहे ज्यामुळे तो तुम्हाला उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण देतो.

संत्री : तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. संत्री खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यासही मदत होते. यासोबतच त्यात पोटॅशियम असते जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

कलिंगड : उन्हाळ्याची तहान भागवायला निसर्गाने भल्या मोठ्या फळाची रचना करून ठेवली आहे, ते म्हणजे कलिंगड! हे कितीही खाल्ले तरी अजीर्ण होत नाही. पोट भरते. मन तृप्त होते. उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन करायलाच हवे.

नारळपाणी : बारमाही उत्तम असे हे फळ आहे. ज्यात पाण्याची मात्रा भरपूर असते आणि हे पाणी शरीरासाठी अमृत ठरते. उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते किंवा फार काही खावेसे वाटत नाही, त्यावेळेस शहाळ्याचे पाणी पोटभरीस मदत करते. शिवाय बॉडी क्लिंझिंग म्हणूनही त्याचा वापर होतो.

काकडी : काही लोकांना फळं महाग वाटत असली तर त्यांनी स्वस्त मस्त असा काकडीचा पर्याय निवडावा. काकडी सोलून त्यावर मीठ, मिरपूड घालून खाल्ली की तहान भागते आणि शरीरात पाण्याची मात्रा संतुलित राहते. देशी काकड्या स्वच्छ धुवून सालासकटही खाता येतात.

ताक : उन्हाळ्यात भरपूर ताक प्या. दोन वाट्या ताकात २ चमचे नाचणीचे पीठ घालून, हिंग, जिरे, मोहरी, लसूणची कमी तेलातली फोडणी दिली तरी छान आंबील तयार होते. नाचणी आणि ताक प्रकृतीसाठी थंड असल्याने ताकाचे सेवन जरूर करावे.

कोकम सरबत : उन्हाळ्यात कोकम सरबत म्हणजे सुख! कोकम आगळ किंवा आमसुला भिजवून कोकम सरबत करता येते. त्यात भाजलेली जिरेपूड आणि किंचित मीठ टाकल्याने लज्जत वाढते आणि शरीरास थंडावा मिळतो.

लिंबू सरबत : लिंबाचा सी व्हिटॅमिन असल्याने शरीरातील रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यास लाभ होतो. मात्र रस्त्यावरील लिंबू सरबत पिणे टाळावे. घरच्याघरी लिंबू सरबत करून त्यात पुदिना, सैंधव मीठ थोडीशी चवीपुरती साखर घातल्यास छान सरबत तयार होते. लिंबाचा रस काढून न ठेवता ते आयत्या वेळी वापरणे केव्हाही चांगले.