लग्न होऊन ३ वर्ष झाली तरीही पती-पत्नीमध्ये दुरावा; मोबाईलमधील एका अ‍ॅपनं झाला मोठा खुलासा, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 08:12 AM2021-08-03T08:12:04+5:302021-08-03T08:23:47+5:30

पती आणि पत्नी यांच्यात नात्यात ३ वर्षापासून दुरावा होता. लग्न झाल्यानंतरही पतीनं कधी बायकोशी जवळीक साधली नाही. त्यामुळे पत्नी खूप चिंतेत होती.

बंगळुरुमध्ये एका दाम्पत्याचा हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका युवकानं घरच्यांच्या दबावापोटी लग्न केले. परंतु ३ वर्ष झाल्यानंतरही पती-पत्नीच्या नात्यात कुठलेही संबंध बनले नाहीत. ते नवरा-बायको होते पण एकाच घरात नवरा अनोळखी असल्यासारखा वागत होता.

नवऱ्याच्या या वागण्यानं बायको खूप चिंतेत होती. अनेकदा तिने नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरली. एकेदिवशी तिने नवऱ्याचा मोबाईल तपासला असता धक्कादायक खुलासा उघडकीस आला.

पीडित महिला राखी(नावात बदल) बंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करते. जून २०१८ मध्ये तिचं लग्न राजेश नावाच्या युवकाशी झालं. मात्र लग्नाला ३ वर्ष उलटली तरीही राजेश राखीकडे लक्ष देत नव्हता. नवरा-बायकोसारखे कुठलेही संबंध दोघांमध्ये कधीच बनले नाहीत. ३१ वर्षीय राजेश एका खासगी बँकेत नोकरी करतो. राखी ही राजेशची दुसरी पत्नी आहे.

राजेशची पहिली पत्नी त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर आपल्या पत्नीने विश्वासघात केला असं राजेशला वाटू लागले. हीच बाब सांगून राजेश राखीच्या जवळ जात नव्हता. राजेशच्या अशा वागण्याने राखी खूप दु:खी होती. कारण राजेशच्या पहिल्या पत्नीची शिक्षा राखीला मिळत होती.

राखीने अनेकदा राजेशला समजवण्याचा प्रयत्न केला. राजेशला विनवणी केली परंतु त्याने राखीचं काहीच ऐकलं नाही. तो सारखा त्याच्या फोनवर व्यस्त असायचा. एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन लागला. त्यानंतर राजेश आता आपल्या जवळ येईल असं राखीला वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. दोघांमधील दुरावा वाढत गेला आणि त्याचे रुपांतर वादविवादात झाले.

राखी आणि राजेश यांच्या भांडणाचं मुख्य कारण होतं राजेशचं सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणं. तो राखीसोबत बोलतही नव्हता. त्यामुळे राखीला आता राजेशच्या वागण्यावर संशय येऊ लागला. यातच राजेशचा मोबाईल राखीला अनलॉक मिळाला.

तिने राजेशचा फोन चेक केला तर त्यात तिला काही अ‍ॅप होते, ते कसले होते हे तिला समजलं नाही. त्यानंतर राखीने राजेशच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. लॉकडाऊनमुळे दोघंही घरातून काम करत होते. त्यामुळे राजेशवर २४ तास लक्ष ठेवणं राखीला सोप्प गेले.

एकेदिवशी राखीला ती संधी मिळाली. तिने राजेशचा मोबाईल घेऊन लगेच ते अ‍ॅप उघडून पाहिले त्यात काही लोकांसोबत राजेश चॅटिंग करत होता. हे चॅट वाचून राखीचा विश्वास उडाला. ते सर्व गे डेटिंग अ‍ॅप होते. तिचा पती कुठल्याही महिलेशी नाही तर मुलांसोबत चॅटिंग करत होता हे पाहून ती हैराण झाली.

जेव्हा राखीने याविषयी राजेशला विचारलं तेव्हा त्याने नकार दिला. राजेश गे असल्याचं लपवण्यासाठी त्याने अनेक बहाणे केले. त्यानंतर त्रस्त झालेली पत्नी राखीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनंतर राजेशला पोलीस ठाण्याला बोलावलं.

त्याठिकाणी राजेश आणि राखीचं काऊन्सलिंग करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या चौकशीत राजेशनं गे अ‍ॅप मोबाईलमध्ये आहेत अशी कबुली दिली. परंतु आजपर्यंत कुठल्याही पुरुषासोबत संबंध बनवले नाहीत असं त्याने पोलिसांना सांगितले. मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर राखीने राजेशसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.