कर्जाचं ओझं असलेल्या AIR INDIA च्या खरेदीचा TATA ना फायदा काय?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:13 AM2021-10-09T10:13:34+5:302021-10-09T10:17:58+5:30

TATA Sons Wins bid for Air India: एअर इंडियाची ‘घरवापसी’; टाटांनी स्थापन केलेली कंपनी टाटांकडेच परत

सरकारी एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे गेली आहे. एअर इंडियासाठी टाटा सन्सने सर्वाधिक १८ हजार कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ६८ वर्षांनी महाराजा पुन्हा टाटांकडे परतला आहे. स्पाईसजेटचे अजय सिंह यांची बोली १५ हजार १०० कोटी रुपये होती. त्यामुळे ते मागे पडले.

पुढील ५ वर्ष एअर इंडियाचे नाव व लोगो बदलता येणार नाही. एअर इंडियाची विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर २०२० मध्ये एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. एअर इंडियासाठी सरकारने १२ हजार ९०६ कोटी राखीव किंमत ठरविली होती. टाटांच्या टॅलेस प्रा. लिमिटेडने लावलेली बोली सर्वोच्च ठरली.

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने यावर अंतिम निर्णय घेतला. टाटा समूहाला १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागणार असून, उर्वरित रक्कम रोख भरावी लागेल. टाटांकडे विस्तारा व एअर एशिया या कंपन्या असून एअर इंडियामुळे टाटांकडे देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा २६.९ टक्क्यांर्पयत वाढेल

पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे, भावनिक नातं असलेली कंपनी पुन्हा आपल्याकडे आल्याचे समाधान टाटांना मिळेल. एअर इंडियावर १०० टक्के मालकी टाटांची असेल. त्यात एअर इंडिया एक्स्प्रेसचीही मालकी असेल. शिवाय मालवाहतूक आणि ग्राऊंड हँडलिंग करणारी एआयएसएटीएस या कंपनीची ५० टक्के मालकीही मिळेल

कंपनीची प्रॉपर्टी, कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांचा ताबाही मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील मुख्यालय, दिल्लीतील एअरलाइन्स हाऊस हेही मिळू शकेल. एकट्या मुंबईतील कार्यालयाचीच किंमत १५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

१७२ विमाने एअर इंडियाकडे आहेत. त्यापैकी ८७ विमानांवर मालकी हक्क आहे. देश-विदेशातील मोठ्या विमानतळांवर कंपनीचे लँडिंग आणि पार्किंगचे स्लॉट आहेत. भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. केंद्र सरकारने एअर इंडियातील ४० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारने नवा प्लॅन तयार केला. त्यानुसार १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय झाला. ७६% हिस्सेदारी विकण्यासाठी मोदी सरकारने बोली मागविली होती. मात्र, त्यावेळ सरकारने व्यवस्थापन आपल्याच हाती ठेवणार असल्याचे सांगितल्याने कुणीही रुची दाखविली नाही.

कंपनीला सर्वप्रथम टपाल वाहतुकीची परवानगी मिळाली होती. जे. आर. डी. टाटा हे स्वत: निष्णात वैमानिक होते. टपाल घेऊन १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराची ते मुंबई हे पहिले विमान त्यांनी स्वत: उडविले होते. त्यानंतर मुंबई ते त्रिवेंद्रम असे पहिले व्यावसायिक विमान झेपावले.

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा अर्थात जेआरडी टाटा यांनी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळी या कंपनीचे नाव टाटा एअर सर्विसेस असे होते. कंपनीचे नाव एअर इंडिया करण्यात आले आणि कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. या विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

सरकारने इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे विलीनीकरण केले. तेव्हापासून एअर इंडिया कधीही नफ्यात आली नाही. १९५३ मध्ये एअर इंडिया देशातील पहिली ऑल-जेट विमान कंपनी झाली. कमी किमतीत उड्डाणासाठी एअर इंडिया एक्स्प्रेस लॉन्च करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या तोट्यामुळे कंपनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात चौथ्या स्थानी घसरली.