TATA च लाभार्थी! TCS च्या बायबॅक योजनेचा ग्रुपच्याच ‘या’ २ कंपन्यांना सर्वाधिक लाभ; कसा? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 11:49 AM2022-01-15T11:49:27+5:302022-01-15T11:56:47+5:30

TCS कंपनीच्या बायबॅक पॉलिसीचा सर्वांत जास्त फायदा टाटा ग्रुपमधीलच २ बड्या कंपन्यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही कायम असले तरी TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या केवळ भारतीय बाजारात नाही, तर शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ घालत आहेत. टाटा ग्रुपच्या अनेकविध कंपन्यांच्या कमाल कामगिरीचा फायदा गुंतवणूकदारांना होत असून, ते मालामाल होत आहेत. अशाने टाटावरील विश्वास आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे.

IT क्षेत्रातील अग्रणी असलेली TATA ग्रुपमधील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आखलेल्या समभाग बायबॅक योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. या बायबॅक योजनेत TATA सन्स सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

TCS च्या संचालक मंडळाने १८ हजार कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेवरही मोहोर उमटवली. विद्यमान भागधारकांच्या हाती असलेल्या समभागांची प्रत्येकी ४,५०० रुपये किमतीला खरेदी केली जाणार आहे.

TATA सन्सकडे TCS चे २६६.९१ कोटी समभाग असून, टाटा समूहातील सर्व कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या या कंपनीचा समभाग पुनर्खरेदी योजनेअंतर्गत २.८८ कोटी समभाग विक्री करण्याचा मानस आहे. तर टाटा समूहातील दुसरी कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे १०,२३,६८५ समभाग आहेत, त्यापैकी ११,०५५ समभागांची विक्री ती करू इच्छित आहे.

परिणामी TATA समूहातील दोन्ही कंपन्यांना TCS च्या १८ हजार कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून १२,९९३.२ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान TCS ने जाहीर केलेल्या १६,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतदेखील सहभागी होऊन TATA सन्सने ९,९९७.५ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले होते.

तर त्याआधी TCS ने १८ मे ते ३१ मे २०१७ दरम्यान केलेल्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून TATA सन्सने १०,२७८ कोटी रुपयांचा धनलाभ मिळविला होता. शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२२ रोजी प्रवर्तक कंपन्यांची टीसीएसमध्ये ७२.१९ टक्के भागभांडवली हिस्सेदारी आहे.

लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला आहे. टीसीएसकडे सप्टेंबर २०२१ तिमाहीअखेर ५१,९५० कोटी रुपयांची रोकड गंगाजळी आहे.

दरम्यान, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे.

TCS ला गेल्या तिमाहीच्या कालावधीत सर्वाधिक ९ हजार ७६९ कोटी रुपये नफा झाल्याचे बोलले जात आहे. TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे.