संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:44 PM2021-05-04T15:44:34+5:302021-05-04T15:50:13+5:30

RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनकडे देश चालल्याचे पाहायला मिळत आहे. (reliance industries RIL pay bonus)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बुडाले, नोकऱ्या गेल्याचे दिसले. मात्र, आता हळूहळू उद्योगजगत सावरताना दिसत आहे. अनेक कंपन्यांना फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीला ५३ हजार ७३९ कोटींचा नफा मिळाला आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.

RIL कडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. २०२०-२१ या करोनाच्या संकट वर्षात कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस आणि व्हेरिएबल पेची घोषणा केली आहे.

इंधन, रसायनापासून ग्राहकोपयोगी सेवा क्षेत्रात विस्तार असलेल्या RIL च्या पाच विभागांमधील कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी ५ टक्के अधिक तरतूद केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२०-२१ या वर्षात कन्झुमर बिझनेसमध्ये ७५ हजार कर्मचाऱ्यांना जोडले आहे. देशातील एका कंपनीकडून केलेली सर्वात मोठी कर्मचारी भरती आहे. कंपनीने यासाठी १४ हजार ८१७ कोटी खर्च केले.

एकीकडे रिलायन्सला कन्झुमर बिझनेसने तारले असले तरी दुसऱ्या बाजूला कंपनीचा मुख्य व्यवसाय असलेल्या इंधन आणि रसायने या व्यवसायाला करोना संकटाचा फटका बसला आहे. या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १० टक्के वेतन कपात सहन करावी लागली होती.

इंधन मागणीत झालेलीही मोठी घट आणि या विभागाची सुमार कामगिरी यामुळे कंपनीने या विभागातील कर्मचाऱ्यांचा बोनस स्थगित केला होता. मात्र, सहा महिन्यानंतर कंपनीने वेतन कपात मागे घेतली होती आणि कर्मचाऱ्यांना बोनसही दिला होता.

गेल्या वर्षी कंपनीची इंधन आणि रसायने उद्योगाची उलाढाल २९ टक्क्यांनी कमी होऊन ३८ हजार १७० कोटी झाली आहे. कोरोना संकटामुळे ऑनलाईन शॉपिंग हा अविभाज्य घटक बनला आहे. त्याचा फायदा घेत रिलायन्स इंडस्ट्रीजने कन्झुमर बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आणि त्यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

यामुळे देशातील बेरोजगारी दर चार महिन्याच्या सर्वोच्च म्हणजेच ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIEE) नं सोमवारी याबाबतची माहिती दिली.

भविष्यात रोजगारच्या बाबतीत ही परिस्थिती आव्हानात्मक राहील. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये आम्ही ७५ लाख रोजगार गमावला, अशी माहिती सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास यांनी दिली.

यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ७.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ९.७८ टक्के आहे. तर ग्रामीण भागात ते ७.१३ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं.

यापूर्वी मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता आणि ग्रामीण तसंच शहरी भागातही हा दर तुलनेने कमी होता.

Read in English