अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:09 PM2020-07-13T13:09:05+5:302020-07-13T13:22:30+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज 12 लाख कोटींचं बाजार भागभांडवल ओलांडणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीज(RIL)ने एक इतिहास रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 12 लाख कोटींचं बाजार भागभांडवल ओलांडणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे.

सोमवारी आरआयएलचे शेअर्स बीएसईवर 3.21 टक्क्यांनी वाढून प्रतिशेअर 1938.80 रुपयांपर्यंत पोहोचले होते. RILच्या समभागात आलेल्या तेजीमुळे कंपनीनं बाजार भागभांडवलात 12 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

RIL ही 12 लाख कोटींच्या बाजार भागभांडवलाला स्पर्श करणारी भारतातील पहिली कंपनी आहे. एका महिन्यांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार भागभांडवल १ लाख कोटींपेक्षा जास्तीने वाढलं आहे.

RIL ने आपल्या टेलिकॉम आर्म जियो प्लॅटफॉर्मवर आणखी एक मोठी करार केला आहे. वायरलेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी असलेल्या क्वालकॉम इनकॉर्पोरेटेडची उपकंपनी क्वालकॉम वेंचर्स या कंपनीने जिओमध्ये 730 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या कराराच्या बदल्यात क्वालकॉम व्हेन्चर्सला जिओमध्ये 0.15 टक्के हिस्सा मिळाला आहे. करारासाठी जिओचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आहे, तर एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये आहे. 12 आठवड्यांच्या आत जिओ प्लॅटफॉर्मवरची ही 13वी गुंतवणूक आहे.

जिओमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सला गती मिळाली असून, जिओ प्लॅटफॉर्मवर निरंतर होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला अच्छे दिन आले आहेत.

मार्चपासून आरआयएलच्या शेअर्समध्ये 123 टक्के वाढ झाली आहे. सोमवारी आरआयएलचा साठा सर्व-उच्चांकी पातळीवर पोहोचला. आरआयएलची बाजारपेठेतील भागभांडवल 12 लाख कोटींच्या पुढे गेले.

एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार भागभांडवल १ लाख कोटींपेक्षा जास्तनं वाढलं आहे. १२ आठवड्यांत जिओ प्लॅटफॉर्मने 25.24 टक्के भागभांडवलामार्फत 1.18 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.

जिओ प्लॅटफॉर्म ही आता जगातील एकमेव कंपनी बनली आहे, जिने सतत मोठ्या प्रमाणात निधी जमा केला.

तुलना करायची झाल्यास गेल्या वर्षी भारतात स्टार्टअप इकोसिस्टमने 1.10 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. निधी उभारण्याच्या बाबतीत हे सर्वोत्कृष्ट वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.