आता Air India चं विमान ना लेट होणार ना रद्द; TATA देणार 'ही' नवी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:26 PM2022-02-12T14:26:28+5:302022-02-12T14:34:20+5:30

Air India TATA : पाहा प्रवाशांना काय होणार फायदा आणि कोणती देणार कंपनी सुविधा.

Air India टाटा समूहाकडे (Tata Group) गेल्यानंतर टाटांच्या ताफ्यात आता ३ एअरलाईन्स कंपन्या झाल्या आहेत. यामध्ये एअर विस्तारा (Air Vistara) आणि एअर एशिया इंडिया (Air Asia India) या कंपन्यांचा समावेश आहे.

टाटा समूहानं या विमान कंपन्यांच्यादरम्यान को- ऑपरेशनचं काम सुरू केलं आहे. सर्वप्रथम याचा फायदा एअर इंडिया आणि एअर एशिया इंडियाच्या प्रवाशांना मिळणार आहे.

एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांनी 'इंटरलाइन कन्सिडरेशन ऑन इरेग्युलर ऑपरेशन्स' (IROPs) करार केला आहे. याचाच अर्थ दोन्ही एअरलाईन्समध्ये कोणत्याही एअरलाईन्सची सेवा कोणत्या ना कोणत्या कारणानं बाधित झाली, तर संबंधित कंपनीच्या प्रवाशांना दुसरी कंपनी उपलब्ध विमानानं जाण्याची सुविधा देणार आहे. परंतु सध्या ही सुविधा दोन्ही कंपन्यांच्या देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे.

टाटांच्या या निर्णयामुळ दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. जर कोणत्याही कंपनीचं विमानाला जास्तच विलंब झाला किंवा विमान कोणत्या कारणामुळे रद्द झालं तर संबंधित प्रवाशांना दुसऱ्या विमानानं प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना यामुळे असुविधा होणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अन्य उपलब्ध विमानामध्ये किती जागा उपलब्ध आहेत, हेदेखील पाहिलं जाईल. त्याच्याच आधारे विमानतळावर जो मॅनेजर असेत तो या संबंधी अंतिम निर्णय घेईल.

यापूर्वी टाटा समुहानं एअर इंडियाचं कामकाज आपल्या हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल दिसू लागले होते. याशिवाय टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं होतं.

एअर इंडियामधील सरकारचा समभाग टाटा सन्सची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर Air India ची उड्डाने, परिचालन, व्यवस्थापन सुरू केले आहे. टाटा ग्रुपने लगेचच महत्त्वाचे बदल करत एअर इंडिया सेवेतील दर्जा वाढवण्यावर भर दिल्याचं म्हटलं जात आहे.

Air India ने ट्विटच्या माध्यमातून TATA ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आवाजातील एक ऑडिओ संदेश शेअर केला होता. एअर इंडियामध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना सोबत घेऊन एअर इंडियाला सर्वाधिक लोकप्रिय एअरलाइन बनवले जाईल, असा विश्वास रतन टाटा यांनी यामध्ये व्यक्त केला.

खुद्द रतन टाटा यांच्या आवाजात असलेल्या या संदेशात पुढे म्हटले होते की, टाटा ग्रुप एअर इंडियाच्या नव्या ग्राहकांचे मनपासून स्वागत करत आहे. Air India परिचालन, सुविधा आणि सेवा यांमध्ये सर्वांच्या पसंतीस उतरण्यासाठी एकत्रपणे काम करण्यास TATA ग्रुप उत्सुक आहे.