Shravan 2021: महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 01:30 PM2021-08-30T13:30:39+5:302021-08-30T13:35:30+5:30

Shravan 2021: महादेवांच्या नामस्मरणात महामृत्युंजय मंत्राला अत्याधिक महत्त्व आहे. (rules to chant mahamrityunjaya mantra)

श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा राजा मानला जातो. तसेच या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतांना, सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. केवळ धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही त्याला तितकेच महत्त्व आहे. (Shravan 2021)

श्रावण हा महादेवांचे पूजन, आराधना, उपासना यांसाठी महत्त्वाचा असल्याचे सर्वश्रुत आहे. या कालावधीत शिवाच्या प्रतिकांनाही तितकेच महत्त्व असते. महादेवांचे पूजन करताना किंवा नामस्मरण करताना अनेकविध मंत्र म्हटले जातात.

अगदी कैलासराणा शिवचंद्रमौळी यापासून ते थेट रुद्रापर्यंत अनेक मंत्र, श्लोक, स्तोत्र म्हटली जातात. मंत्र्यांचा विचार केला. तर यामध्ये महामृत्युंजय मंत्राला अत्याधिक महत्त्व आहे. हा मंत्र प्राणरक्षक आणि महामोक्ष मंत्र म्हणूनही ओळखला जातो. (rules to chant mahamrityunjaya mantra)

या मंत्रपठणामुळे महादेवांची कायम कृपा राहते, भोलेनाथ प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतात, अशी मान्यता आहे. मात्र, या मंत्राचा उच्चार हा नेमकेपणानेच करावा. हा मंत्रोच्चार करताना चूक होता कामा नये. आपणास नेमके उच्चारण ठाऊन नसल्यास ते शिकून घ्यावे, असे सांगितले जाते.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।। ॐ स्वः भुवः भूः ॐ। ॐ सः जूं हौं ॐ। असा हा महादेवांचा महामृत्युंजय मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात. (mahamrityunjaya mantra)

महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. महामृत्युंजय मंत्र म्हणजे भगवान शिवांची स्तूती करण्याहेतू केली गेलेली एक प्रकारची वंदनाच आहे. या महामृत्युंजय मंत्रांचा अर्थ ‘मृत्यूवर विजय पावणारा परमात्मा’ असा सांगण्यात आला आहे.

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न होते. भगवान शिवाची आराधना करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्री आदी प्रसंगी या मंत्राचे पठन मंदिरात सतत सुरू असते. आपल्या सर्व दुःखाचे निवारण करणारे आपल्या जीवनात सुख, शांती आणि चांगले आरोग्य लाभ देणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचे नियमित पठन करावे, असे सांगितले जाते.

महामृत्युंजय मंत्र नुसत्या जमिनीवर बसून म्हणू नये. धर्मशास्त्रानुसार, पहाटे २ ते ४ वाजण्याची वेळ ही उत्तम मानण्यात आली आहे. ब्राह्ममुहुर्तावर जप करणे शक्य नसल्यास सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यावर करावा.

महामृत्युंजय मंत्राची संख्या नेहमी वाढती असावी. ती कमी होता कामा नये. स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारण करावे. अति मोठ्याने करू नये. मृदु आवाजात शांतपणे जप करावा. जप करताना पूर्व दिशेला बसावे. एका जागा सुनिश्चित करून तेथेच बसून जप करावा.

जपाला बसलाना महादेवाची मूर्ती, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र समोर ठेवावे. मन एकाग्र ठेवावे. केवळ जपाचा विचार करावा. जपावेळी उत्साह, चैतन्यमय वातावरण असावे. आळसात किंवा जांभई देत देत जप करू नये, असे काही नियम सांगितले जातात.