Mahabharata: महाभारतानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता आहे? मग ‘हे’ वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:13 PM2021-07-16T12:13:49+5:302021-07-16T12:20:00+5:30

Mahabharata: महाभारत युद्धानंतर काय झाले, पांडव कुठे गेले, कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, संजय यांचा मृत्यू कसा झाला, महाभारतानंतर या व्यक्ती काय करत होत्या, कलियुग केव्हा सुरू झाले, या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

भारतीय संस्कृती, परंपरा यामध्ये तत्त्वज्ञान, इतिहास यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यामध्ये रामायण आणि महाभारत यातून अमोघ तत्त्वज्ञान, मर्यादा, शिकवण सांगितलेल्या आहेत.

श्रीविष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांची महाभारतातील भूमिका सर्वश्रुत आहे. महाभारत हे महाकाव्य असून, हिंदू धर्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले.

धर्म आणि अधर्म या तत्त्वांवर हे युद्ध लढले गेले. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युद्ध होऊन पांडवांचा विजय झाला. याच युद्धात श्रीकृष्णाच्या मुखातून कालातीत अशा भगवद्गीतीचे जन्म झाला. गीता तत्त्वाचे अनेक दाखले आजही देता येतात.

मात्र, महाभारत युद्धानंतर काय झाले, पांडव कुठे गेले, कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, संजय यांचा मृत्यू कसा झाला, महाभारतानंतर या व्यक्ती काय करत होत्या, कलियुग केव्हा सुरू झाले, या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

महाभारत युद्धात प्रचंड हानी झाली होती. महाभारत युद्धात अनेक शूरवीर, महारथी मारले गेले. धृतराष्ट्राने सर्व ९९ मुले गमावली. युयुत्सु नावाचा एक कौरव पांडवांच्या बाजूने युद्धात उतरला होता. त्यामुळे तो एकमेव कौरव जीवंत राहिला. युयुत्सुचा जन्म एका दासीपासून झाला होता, असे सांगितले जाते.

पांडवांचा विजय झाल्यानंतर त्यांना हस्तिनापूरची सत्ता मिळाली. महाभारत युद्धाच्या १५ वर्षांनंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय राजेशाही थाट सोडून वनवासात निघून गेले.

आपल्या पापकर्मातून मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी तपस्या करण्याचा निर्णय घेतला. वनात एके ठिकाणी एक आश्रम बांधून हे सर्व जण आगामी जीवन व्यतीत करू लागले. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय तीन वर्षे वनात राहून आपले जीवन व्यतीत केले.

एक दिवस धृतराष्ट्र नदीवर स्नानासाठी जातात. तेवढ्यात वणवा पेटतो. वणवा पाहून कुंती, संजय आणि गांधारी अत्यंत भयभीत होतात. आश्रम सोडून धृतराष्ट्र यांना धोका नाही ना, हे पाहण्यासाठी सर्व जण नदीकिनारी धाव घेतात. सर्वांनी वन सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती संजय करतो.

मात्र, तिघे जण वन सोडून जाण्यास नकार देतात आणि वणव्यात देहत्याग करण्याचा संकल्प करतात. शेवटी या वणव्यात धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारी पंचतत्त्वात विलीन होतात.

धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पंचतत्वात विलिन झाल्यानंतर संजय हिमालयात निघून जातात. हिमालयात गेल्यावर संजय सन्यास घेतात. पुढील सर्व आयुष्य एका सन्याशाप्रमाणे व्यतीत करतात.

आप्तेष्टांच्या मृत्यूची वार्ता ऐकून पांडवांना आत्यंतिक दुःख होते. ज्या ठिकाणी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी जाऊन पांडव त्यांचे उर्वरित कार्य करतात.

यानंतर श्रीकृष्ण आपले अवतार कार्याची सांगता करण्यास सुरुवात करतात. द्वारका पुन्हा समुद्रात विलीन होते. द्वारकावासियांना घेऊन पांडव सुरक्षित ठिकाणी जातात. एका पारध्याच्या बाणाच्या माध्यमातून श्रीकृष्ण आपल्या अवतार कार्याची सांगता करतात.

सर्व व्यवस्था लावल्यानंतर युधिष्ठीर, भीम, अर्जुन, नकूल-सहदेव हे पांडव आपले अवतार कार्य संपवतात. पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या अवतार कार्य समाप्तीनंतर कलियुगाचा प्रारंभ होतो. कलियुग हे सर्वांत शेवटचे युग मानले गेले आहे.